Thursday, November 24, 2022

Social Life...

"चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, गेली अनेक वर्षं मराठी, हिंदी चित्रपटांमधून आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ह्यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन" अशा अर्थाच्या बातम्या काल रात्री whatsapp वर एकापाठोपाठ एक येऊन धडकायला लागल्या तेव्हा, पटकन, पहिली प्रतिक्रिया आली, 'अरे, आज दुपारीच तर वाचलेलं मी, त्यांना admit केल्याचं'. म्हणजे अर्थात, admit केल्यावरही लगेच जाऊच शकतो माणूस; पण जुने काही अनुभव गाठीशी असल्यामुळे, आधी शहानिशा करावी म्हणून google उघडलं. तर तिथे अनेक प्रसिद्ध वर्तमानपत्रं आणि channels वाल्यांनी हे officially declare करणाऱ्या बातम्या टाकल्या होत्या. अहो, एवढंच काय, बातमी आल्या आल्या काही वेळात बघितलं तर विकिपीडिया वर पण 'date of death' वगैरे update केलेली!!! 🙄🙄 का कोण जाणे, पण तेव्हा काही मला श्रद्धांजलीचा status वगैरे ठेवावासा वाटला नाही. आणि तो तसा वाटला नाही हे किती उत्तम झालं हे आज उठल्यावर कळलं. विक्रम गोखले अजून जिवंत आहेत अहो!!

हल्ली तशी प्रत्येकालाच प्रचंड घाई असते 'socially react' होण्याची; पण ह्या case मध्ये, सामान्य माणसांना तरी काय म्हणणार? कारण मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी, channel वाल्यांनी officially ह्या बातम्या टाकल्या होत्या. कित्येक celebrities नी पण twitter वरून श्रद्धांजली वाहिली होती, अजूनही वहात आहेत! त्यामुळे लोक तरी अजून काय शहानिशा करणार? पण मग ज्या media वाल्यांनी ह्या बातम्या दिल्या, त्यांनी जास्त सजग असायला नको? त्यांची काहीच जबाबदारी नाही? 

का एवढी घाई होत असेल ह्या media वाल्यांना, एखाद्याच्या मृत्यूची बातमी cover करण्याची? नाही म्हणजे, अजूनही विक्रम गोखलेंची प्रकृती तशी गंभीरच आहे आणि खरंच काहीही होऊ शकतं वगैरे असेलही खरं - ते बरे होऊन, त्यांना दीर्घायु लाभो ही प्रार्थना - पण अजून तरी धुगधुगी का होईना आहे ना??? मग का घाई ह्यांना? 😡😡😡 चुकून आपल्याआधी इतर कुणी ही बातमी दिली तर आपण स्पर्धेत मागे पडायला नको म्हणून?

गेल्याच महिन्यात facebook, youtube वगैरे अनेक ठिकाणी, जिथे तद्दन फिल्मी बातम्यांचं पेव फुटलेलं असतं, तिथे बातमी होती प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र ह्यांचे निधन! अनेक ठिकाणी होती ही बातमी आणि मुख्य म्हणजे गोलात 'jumping jack जितेंद्र' ह्यांचा फोटो वगैरे. Usually, मी असल्या बातम्यांच्या नादी लागत नसते; पण अनेक ठिकाणी, फोटोसकट दिसल्यामुळे एके ठिकाणी वाचलीच बातमी... तर आतमध्ये लिहिलेलं होतं 'Black Friday fame अभिनेते जितेंद्र शास्त्री ह्यांचे निधन झाले आहे.' संताप झाला माझा हे वाचून!! अरे, फक्त लोकांना attract करण्यासाठी, तुम्ही same नावाच्या, एका जास्त प्रसिद्ध, पण जिवंत अभिनेत्याचा फोटो लावणार मृत्यूच्या बातमीवर??? किती खालच्या दर्जाचं आहे हे सगळं!!

प्रत्येक व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवायचा असतो आणि त्यासाठी तो काही ना काहीतरी शक्कल लढवत असतो. पण म्हणून खप वाढावा, viewer count वाढवा, म्हणून काहीही करणार का? इतकी cheap mentality झालीय आजकाल आपली? म्हणजे कुठल्याही घटनेची पहिली बातमी कोण देणार, कोण 'सगळ्यात तेज' आहे ह्याची इतकी अहमहमिका लागलेली आहे की, ती घटना प्रत्यक्ष घडलीय का नाही हे न बघताच बातमी देऊन मोकळे!! आणि मग पुढे त्यावर चर्वितचर्वण करायला आहेतच 'social media platforms'! 
 
ह्या case मध्ये, श्रद्धांजलीचे status वगैरे ठेवणाऱ्या सामान्य लोकांची चूक नसेल एक वेळ; पण एकूणच आपल्यालाही सगळ्यांना हल्ली व्यक्त होण्याची - 'socially व्यक्त होण्याची' प्रचंड घाई झालेली असते - socially हे जास्त महत्वाचं. कारण प्रत्यक्षातल्या, जवळच्या माणसांबरोबर connect होणं मात्र अवघड होतं चाललंय बऱ्यापैकी, जे खरं तर खूप गंभीर आहे. सध्या चालू असलेल्या 'श्रद्धा case' मध्येही हेच तर दिसून आलंय.
आभासी जगाचं जास्त आकर्षण निर्माण झाल्यामुळे वास्तवापासून कुठेतरी दूर जातोय का आपण? सगळ्यांचं नक्कीच होत नसेल असं, पण तरीही अशांचं प्रमाण जास्त आहे एवढं नक्की...
सखोल अभ्यास करून, काही संशोधन करून, त्यावर मनन करून social media वर लिखाण किंवा video रूपाने व्यक्त होणारे नक्कीच आहेत; पण फारसा कुठल्याच विषयाचा धड अभ्यास नसताना, फार काही विचार न करता, इकडचं-तिकडचं ऐकून, वाचून, अर्धवट ज्ञानावर इथे तिथे comment रूपाने व्यक्त होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे एवढं नक्की...
खूप सुंदर आशय तसंच मांडणी असलेले reels किंवा video बनवणारे नक्कीच आहेत, पण खपतायत म्हणून काहीही निरर्थक, पांचट reels बनवणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे एवढं नक्की...

'करणारे करतात आणि बघणारे बघतात, आपल्याला काय?' असं म्हणून हा विषय सोडून देणं सोप्पंय तसं, पण वाईट वाटतं की ह्या सगळ्याचा परिणाम वैयक्तिक न राहता, एकंदरीत एक समाज म्हणून आपला दर्जा खालावत चाललाय. गुणवत्ता गुंडाळून ठेवलीय आपण आणि संवेदनशीलता संपत चाललीय आपल्यातली... एखाद्याच्या मृत्यूच्या बातमीची post असली तरी त्यावरही दात काढणारे महाभाग असतात... 'मी काहीही करेन, माझी मर्जी!' ही वृत्ती वाढत चाललीय. 

मी पुन्हा म्हणेन की ह्याचा अर्थ सगळीकडे, सगळं फक्त नाकारात्मकच घडतंय असं नाही. Social media चे फक्त तोटेच आहेत असं मुळीच नाही. फक्त आपले लगाम ह्या भस्मासुराच्या हातात न देता, त्याचे लगाम आपल्या बुद्धीच्या ताब्यात ठेवले पाहिजेत!!! 


© रश्मी पानसे - नाझिरकर

(ह्याच संदर्भात काही वर्षांपूर्वी, मला वाटतं 2017 साली, अजून एक लेख लिहिला होता मी. तो ही इथे share करत आहे.)

============================================

काल कुठेशी एक बातमी वाचनात आली - 'कित्येक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या  मृत्यूच्या बातमीने त्यांच्या ट्वीटर खात्यावर पडला RIP चा पाऊस!' इतर कुठेच ही बातमी नव्हती आणि tv वर पण काही नव्हतं त्यामुळे जरा आश्चर्यानेच मी पुढे वाचायला लागले. तर, त्या बातमीत लिहिलं होतं की कुठल्याशा social site वर काही चुकीने फरीदा जलाल यांच्या प्रोफाईल खाली त्यांच्या जन्म तारखेबरोबरच मृत्यूची तारिख पण दिली होती आणि ती कालचीच होती आणि ते बघून लोकांनी RIP चा अक्षरश: पाऊस पाडला होता. नंतर कळलं की फरीदा जलाल अगदी व्यवस्थित आहेत! म्हणजे अगदी 'आपुले मरण पाहिले म्यां डोळा' अशी अवस्था अनुभवली असेल नाही जलाल बाईंनी?!! मला आठवतंय, अगदी लहानपणी, जेव्हा मरण हि संकल्पना नुकतीच माहिती होऊ लागली होती तेव्हा, मला वाटायचं की आपण मेलं तरी हळूच डोळे उघडून बघता यायला हवं आपल्याला मधेच; म्हणजे आपल्यासाठी कोण किती रडतंय वगैरे बघता येईल आपल्याला! आज ते भाग्य फरीदा जलाल यांना लाभलं बुवा!! आणि हे असं भाग्य लाभलेल्या त्या काही पहिल्याच नाहीत बरं. गेल्या २-३ वर्षांत, शक्ती कपूर, राजपाल यादव यांसारख्या अजूनही काही celebrities च्या बाबतीत असे किस्से घडले आहेत. भाग्यवानच नाही हे सर्व? लोक आपल्यावर किती 'प्रेम' (?) करतात ते यांना 'याची देही याची डोळा' बघता आलं.. 

हे विनोदी नाहीये खरं तर. Social media नावाचं एक वादळ दिवसेंदिवस जास्त जास्तच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करायला लागलंय. या वादळाने उडवलेली धूळ डोळ्यात - आणि डोक्यातही - गेल्यामुळे , आता आपण नक्की कुठे चाललोय किंवा काय करतोय हे बहुतेक कुणाला कळेनासंच झालंय. त्यामुळेच बहुदा, आपण कुठे काय reaction देतोय, आपण जे फॉरवर्ड करतोय ते खरंच खरं आहे की नाही, त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात याचा साधा विचार करायचं भानही अनेकांना राहिलेलं नाही. आला काही मेसेज की कर Whatsappवर १०० जणांना फॉरवर्ड नाहीतर टाक फेसबुकवर.. दुर्दैवाने, या 'डोकं गहाण टाकून नुसतं येईल ते फॉरवर्ड' करण्याच्या नादात माणसांची ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी हरवत चालली आहे. कारण कितीशी माणसं स्वतः काही विचार करून, लिहून वगैरे पोस्ट करतात? 'बस ईधरका माल उधर'!!

सुरवाती सुरवातीला, एकमेकांपासून दूर गेलेल्या माणसांना जवळ आणण्यासाठी कौतुकपात्र ठरलेल्या या social media चा आता खरोखर अतिरेक झालाय. आता ते दूरचेच इतके जवळचे वाटू लागलेत की खरे जवळचे नजरेआड होत चाललेत. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी धडपणे बोलायलाही वेळ नसणाऱ्या माणसांकडे virtual जगतात इतकं ऍक्टिव्ह असायला वेळ कसा असतो हे एक आश्र्चर्यच आहे. अनेक दिवसांनी एकत्र आलेली बहिण-भावंडं, मित्रमंडळी जेव्हा समोरासमोर एकमेकांशी बोलून, मनाने जास्त जवळ येण्याऐवजी एकाच खोलीत बसून, पण आपापल्या मोबाईल्स मधे डोकी खुपसून, त्यावरच्या कुठल्याशा ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी बोलताना (?) दिसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते खरंच! म्हणजे आपण ज्या व्यक्तीशी virtual माध्यमातून बोलत आहोत ती स्वतः, प्रत्यक्ष, आत्ता या क्षणी आपल्या समोरच आहे आणि आपण तिच्याशी फेस -टू-फेस पण बोलू शकतो हेही विसरायला होत असेल माणसाला? आणि मग त्यातूनच 'नवरा, जेवणाच्या टेबलवर समोरच बसलेल्या बायकोकडे पोळी पण Whatsapp वरूनच मागतोय' अशा प्रकारचे jokes (?) तयार  होतात आणि मग काय? ते पण हजारोंना फॉरवर्ड!!

आपल्या आयुष्यात घडणारी अगदी छोट्यात छोटी आणि खरं तर ज्याने दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही अशी प्रत्येक घटना social websites वर टाकून पब्लिसिटी मिळवायचं व्यसनच जडलंय हल्ली कित्येकांना.. मग मतदान केल्याचे photos टाकणं म्हणजे तर फारच 'important' गोष्ट! आपण आपलं एक बेसिक कर्तव्य पार पाडलंय हे कळायला नको का जगाला?! कुठल्याही प्रेक्षणीय ठिकाणी जा, माणसांना ते स्थळ, तो परिसर डोळ्यात साठवून घेण्यापेक्षा स्वतःची छबी कॅमेऱ्यात साठवण्यातच जास्ती इंटरेस्ट असतो. आणि मग लगेच त्या छब्या जातात फेसबुकवर. म्हणजे प्रत्यक्ष ते स्थळ बघण्यापेक्षा, 'आम्ही असं असं स्थळ बघून आलो' हे लोकांना कळवण्यातच खरा आनंद! या पब्लिसिटीच्या नादात अगदी खाजगी क्षण सुद्धा चव्हाटयावर आणू लागलेत आजकाल लोक.. बरं, तुम्ही आज काय खाल्लं, कितीला उठलात किंवा कुठली सिरीयल पाहिलीत याच्याशी तमाम जनतेचा काय संबंध? (एखाद्या वेळी काही special असेल तर ठीके, पण रोज रोज?!!) खोटं वाटेल पण फेसबुकच्या एका ग्रुपवर नुकतीच एका महाभागांनी एक पोस्ट टाकली होती - 'आज सकाळी माझा गाल चावला गेला!!!!!!!!' अरे???!!! काय हे? आता फक्त 'लघु किंवा दीर्घ शंकेला जाऊन येत असल्याचे' updates टाकू नयेत कुणी म्हणजे मिळवली!!! हा social mediaचा वापर म्हणायचा की गैरवापर?

खरं पहायला गेलं तर 'social' या शब्दात 'society' चा - 'समाजाचा' काहीतरी विचार असणं अभिप्रेत आहे. पण मग, 'socially active' असणारे कितीजण खरंच 'समाजासाठी active' असतात? अगदी 'समाजकार्य' वगैरे राहूचदे पण कित्येक घरांमधे आज अशी परिस्थिती आहे की virtual जगातली नाती जोडण्याच्या नादात घरातल्याच म्हाताऱ्या माणसांशी निवांत बसून चार शब्द बोलायला पण कुणाला फारसा वेळ नाही. समाजकार्य करायचं म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात जाणे वगैरे तर लांबचीच गोष्ट झाली.. हां पण social sites वर सामाजिक विषयांवर गप्पा सुरु करा - सगळे पुढे! नुसत्या कृतीशून्य चर्चा.. 'Social' च्या नावाखाली जास्तीत जास्त 'स्वकेंद्रित' होणं म्हणजे 'socially active' असणं असं गणित झालंय बहुतेक. कुठल्याही गोष्टीप्रमाणे यालाही अपवाद आहेत अर्थात. या 'social media' चा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेऊन काही विधायक करणारे लोक ही आहेत; पण दुर्दैवाने खूपच  कमी. बाकीचे सगळे मात्र 'social' पोस्ट टाकता येण्यासाठीच 'life' जगतात की काय देव जाणे!!       
   

© रश्मी पानसे - नाझिरकर

Sunday, November 6, 2022

नित्य दिवाळी!!

येणार, येणार; आली, आली म्हणता म्हणता दिवाळी येऊन गेली सुद्धा...

आणि हे ह्याच वर्षीचं नाही, तर दर वर्षीचं आहे. कित्ती आधीपासून दिवाळीचे वेध लागत असतात!! म्हणजे खरंतर, नवीन वर्षाचं calendar आल्या आल्याच, पहिले, 'ह्या वर्षी दिवाळी कधीये?' हे बघणारे माझ्यासारखे बरेच असतील. पण ती आली की भरकन संपूनही जाते... नुकतीच दिवाळी होऊन गेलीय हे दर्शवणाऱ्या उगाच चार दोन किरकोळ खुणा तेवढ्या मागे राहतात... दारात दिमाखात उभा असलेला, पण हळूहळू पडझड व्हायला लागलेला, किल्ला... 'हो, हो, उद्या नक्की काढतो' म्हणत नवऱ्याने तसंच ठेवलेलं दारावरचं lighting आणि आकाशकंदील... (दिवाळीतल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने केलेली रोषणाई, direct इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावरच निघते बरेचदा 😜😜) डब्यांमधून उरलेले फराळाचे पदार्थ... (हो, हे लिहीत असताना ते डबेही जाणीव करून देतायत मला की 'नवऱ्याचं lighting चं काम जसं pending आहे तसंच तुझंही हे नंतरच्या आवराआवरीचं काम राहिलंच आहे' 😔😔) लेकाच्या फटाक्यांपैकी, नंतर match जिंकल्यावर वगैरे फोडण्यासाठी म्हणून ठेवलेले थोडेफार फटाके... एव्हाना बऱ्यापैकी संपत आलेला 'मोती' साबण... बाहेरून कुठेतरी लांबून, मधेच येणारे फटाक्यांचे आवाज... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी संपली तरी सुट्टी संपली नसल्यामुळे घरात चालू असणारा धिंगाणा... 

 

आपल्याकडे इतके विविध सण असले तरी दिवाळी म्हणजे सगळ्यात लाडका सण - अगदी लहानपणापासून. बहुतेक सगळ्यांचंच असावं असं. अर्थात वय वाढल्यामुळे आणि बदललेल्या भूमिकांमुळे, उत्साहाची level पण बदललीय आताशा. कारण लहानपणी काय, सण साजरा करण्याचे सगळे कष्ट तर आईबाबांनीच घेतलेले असायचे. आम्ही म्हणजे नुसतं, 'खाओ पीओ, मजा करो'! आईने बिचारीने खपून बनवलेला फराळ हाणायचा, बाबांनी आणून दिलेले फटाके, दादाच्या मागे मागे करत फोडायचे, नवीन कपडे घालून मिरवायचं, बास!! पण आता आईची भूमिका माझ्याकडे आल्यामुळे, ती खपून फराळ बनवणारी 'बिचारी', मी असते! 😜😜 मग आपोआपच लहानपणच्या निष्काळजी, निवांत उत्साहाला, जबाबदारीचा break लागतोच ना! 😂😂 

 

तर ह्या फराळाची एक वेगळीच तऱ्हा! दिवाळी आली आणि फराळाचा विषय सुरू झाला की दरवर्षीचा एक ठरलेला dialogue म्हणजे, 'हेss उगीच आपलं मरमरून इतकं सगळं बनवायचं आणि शेवटी संपवताना मारामार'! आणि दर वर्षी असंच म्हणत म्हणत, परत फराळ मात्र बनवायचा सोडायचा नाही! 🤭🤭 त्यात दरवर्षीचा अनुभव असला तरी नवरा सांगणार, 'भरपूर बनव हां काय ते, उगीच एवढं एवढंसं नको 🙄🙄, कुणाकुणाला द्यायला वगैरे कमी नकोय पडायला..' नाही, ते कुणाकुणाला दिलं जातं हे खरंय, पण ते 'कुणीकुणी' पण देतातच की आपल्याला!! पण नाही! बायकोचं पटवून घेतलं तर त्सुनामी नाही येणार?? 😏😏 आणि पहिल्याच दिवशी ह्याचा स्वतःचा, फराळाचं खाण्याचा उत्साह निम्म्यावर आलेला असतो. पण काय करणार? 'नवऱ्याला खुश ठेवण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो' वगैरे तद्दन फिल्मी dialogues चा पगडा असल्यामुळे, खपते 'बिचारी'! 😜😜

 

ह्या फराळाच्या पदार्थांचं ना, आपल्या आयुष्यासारखं असतं, किनई? आपल्याला हव्याहव्याशा गोष्टी चटकन संपून जातात. म्हणजे आपला तसा स्वभावच असतो; आवडणाऱ्या, हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टींनाच preference देण्याकडे आपला कल असतो आणि जरा कमी आवडत्या गोष्टी आपण उगाचच मागे टाकत राहतो - भले नंतर तरी त्या आपल्यालाच पूर्ण करायच्यात हे माहीत असूनही... पण अशाने, शेवटी, नकोशा वाटणाऱ्या गोष्टी एकत्र साठून राहतात आणि आपल्यालाच त्या संपवाव्या लागतात. फराळाच्या बाबतीत किमान, अगदीच आपल्याला खपलं नाहीच, संपलं नाहीच तर, शेवटी, आपल्या घरी येणाऱ्या मावशींना वगैरे देऊन तरी टाकू शकतो आपण एकवेळ; पण आयुष्याच्या बाबतीत मात्र तसं नसतं ना boss! My life, my sufferings : non-transferable! 

 

फराळासारखीच अवस्था कपड्यांचीही! बरेचदा, घ्यायचे म्हणून नवीन कपडे घेतले जातात; पण नंतर, कपाटातून ओसंडून वाहणाऱ्या आधीच्या कपड्यांना 'sharing' शिकवून, नव्या कपड्यांसाठी जागा करून द्यायला लावावी लागते; नाहीतर जुमानत नाहीत अहो ते! 😜😜

पणत्यांचीही तीच गत... जितक्या जास्त पणत्या मांडू, तेवढं सुंदर दिसतं म्हणून मारे उत्साहाने जास्तीत जास्त पणत्या लावल्या जातात; पण दिवाळी संपली की त्यांची सगळी उस्तवार करावी लागते. 

उटणी वगैरे संपवावी लागतात, तेला-उटण्यासाठी काढलेल्या चांदीच्या वाट्या नीट आत ठेवून द्याव्या लागतात. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे 2-3 दिवस आणि कदाचित पुढचेही काही दिवस जी वेगवेगळी खादाडी होते, तिच्या पार्श्वभूमीवर शरीराला पण मुश्किलीने 'normal' वर आणावं लागतं... 🙈🙈

 

म्हणजे प्रत्यक्ष दिवाळी तर 2 नाहीतर 3 दिवसात निघूनही जाते; पण मागाहून करण्यासाठी कामांची list मात्र ठेवून जाते. आणि तरीही ती आपल्याला इतकी हवीहवीशी का बरं वाटत असेल? कारण, येण्याच्या आधीपासून, प्रत्यक्ष असताना आणि गेल्यावरही ती आपल्याला एक नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवा प्रकाश देऊन जाते! कुठल्या ना कुठल्या आठवणींच्या रूपाने कित्येक दिवस आपल्या मनात रेंगाळत राहते! नात्यांमधली वीण घट्ट करून जाते! 

 

एखादी गोष्ट आपल्याला कितीही हवीहवीशी वाटली, तिच्यासाठी आपण कितीही मेहनत घेतली असली, तरीही ती काही कायमसाठी रहात नाही, ती मागे सोडून आपल्याला पुढे जावंच लागतं. दिवाळीसाठी कितीही खपून, कितीही मोठी, कितीही सुंदर रांगोळी काढली आणि ती भले आपल्याला कितीही आवडली, तरी दुसऱ्या दिवशी ती पुसून टाकावीच लागते ना, तसंच... 

आणि ह्याचीच दुसरी बाजू अशीही आहे की एखादी गोष्ट कायमसाठी राहणार नाहीये म्हणून 'जाऊदे ना, काय दोन दिवसांसाठी एवढं करत बसायचं?' असं म्हणत, तिच्यासाठी कष्टच घेतले नाहीत असंही करून चालत नाही. नाहीतर आपल्याला कशातूनच आनंद मिळणार नाही. त्या त्या वेळचे कष्ट सुद्धा एक वेगळं समाधान देऊन जात असतात. त्या त्या क्षणाचा आनंद देत असतात! 

 

दिवाळी हा प्रकाशाचा सण! दुरीताच्या, नकारात्मकतेच्या तमावर मात करण्याचा सण! आपले सगळे प्रश्न, तात्पुरते का होईना, बाजूला ठेवून, आनंद घ्यायची आणि द्यायची शिकवण आपल्याला दिवाळी देते. आणि मग, अशा पद्धतीने, कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगात गुंतून न पडता, येईल तो क्षण साजरा करणं जर आपल्याला जमायलाच लागलं, तर आपल्याकडे तर 'नित्यच दिवाळी' होईल, नाही का??? 🪔🪔🪔

 

 

© रश्मी पानसे - नाझिरकर

 

 

 

 

Saturday, October 15, 2022

जालीम औषध!! 😜😜

सर्दी झाली, घसा दुखतोय,
काय करू, कळेना...
फराळाचं कसं बनवू,
मला काही सुचेना...

डोकं दुखतंय, ठणठण करतंय,
आवाज सहन होईना...
शांत बस म्हटलं तरी,
लेक काही ऐकेना...

डोळे दुखतायत, किरकिर करतायत,
पाणी गळणं थांबेना...
कामं सगळी पडलीयत पण,
काही करू वाटेना...

पडून राहते, मोबाईल बघते, 😜😜
नवऱ्याला ते बघवेना...
दुखणी सगळी कुठे गेली,
म्हणतो, मोबाईल बघताना...

डोळे दुखत नाहीत का, म्हणतो,
स्क्रीनकडे त्या बघताना...
पोराच्या आवाजाने डोकं उठतंय,
Reels चा त्रास कसा होईना... 🙄🙄

जळलं मेलं, टोमणे मारणं,
आराम माझा बघवेना... 😏😏
एवढ्या सर्दीत, काम कसं करू?
मोबाईलसाठी शक्ती पुरेना... 

"खरंच" त्रास होत असेल तर,
गपगुमान, म्हणे, झोप ना...
औषध म्हणून, आधी मोबाईल,
लागतोच, त्याला कळेचना!! 😜😜


© रश्मी पानसे - नाझिरकर



Friday, October 14, 2022

चंदा है तू!!!

कोजागरी पोर्णिमा आहे, हातात दुधाचा ग्लास आहे, आकाशातला पूर्ण चंद्र आणि त्याचं चांदणं मनाला वेड लावतंय... आणि अशा वेळी गाणी आठवली नाहीत तर तो 'foul' धरतात म्हणे! कुठल्याही संगीतप्रेमी माणसाला अशा वेळी आपोआपच स्फुरण चढेल!

काल असंच त्या चंद्राकडे बघताना मनात विचार आला, की चंद्र आपल्याला जास्त जवळचा वाटायला लावला तो ह्या गाण्यांनीच! हे असं म्हणणं खरंतर तसं धाडसाचंच आहे आणि त्यासाठी मी चंद्राची अगदी मनापासून माफीही मागते. चंद्राचं शीतल, मनाला भुरळ पाडणारं सौंदर्य नक्कीच निर्विवाद आहे; पण तरीही ह्या गाण्यांनी चंद्राशी आपलं काही ना काहीतरी नातं जोडून दिलं - तो कुणाचा मामा तर कुणाचा भाऊ, कुणाचा सखा तर कुणाचा जिवलग, कुणाचा साक्षीदार तर कुणाचा हमदर्द झाला... कुणाकुणाचा तर प्रतिस्पर्धी देखील! आणि ही किमया नक्कीच गाण्यांचीच!

अगदी लहानपणापासून चंद्राने आपल्या भावविश्वात स्थान पटकावलेलं असतं. 'चांदोबा, चांदोबा, (चांदोमामा, चांदोमामा) भागलास का?' हे बडबडगीत ऐकलं नसेल असं एकही मराठी मूल नसेल. पिढ्यानपिढ्या तो चंद्र आपला निंबोणीच्या झाडामागे लपत राहतो बिचारा! पण फक्त मामाच नाही बरका, हा चंद्र कधीकधी "गुरुजी" ही बनतो आणि वाऱ्याच्या विमानात बसून मुलं चांदोबा गुरुजींची शाळा बघायला गगनाची सहल करून येतात. 'चांदोबा, चांदोबा भागलास का?' असो नाहीतर 'ह्या वाऱ्याच्या बसुनी विमानी' असो, हल्लीच्या animations मुळे ही गाणी जास्ती आकर्षक बनली आहेत! 'चंदा राणी, चंदा राणी, का गं दिसतेस थकल्यावाणी?' ह्या बालगीतात तर चंद्राचा उल्लेख स्त्रीलिंगी केलेला आहे! 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चंद्राचं आकर्षण असतं हे जरी खरं असलं तरी त्याच्यावर जास्त हक्क मात्र तरुणाईचा आणि त्यातही प्रेमी युगुलांचाच!! चंद्रामध्ये त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसतो किंवा मग तो चेहराच चंद्र वाटायला लागतो!! मला तर वाटतं की उपमा किंवा रूपक ह्या दोन्ही अलंकारांसाठी सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द असेल चंद्र!! 'ये चांद सा रोशन चेहेरा' असो, नाहीतर 'चेहेरा है या चांद खिला है' असो...  'एक लाजरा न साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं' असो, नाहीतर 'चांद माझा हा हासरा' असो... कालिदासपासून ते आजच्या एखाद्या, नुकतीच कविता लिहायला लागलेल्या, कवीपर्यंत प्रत्येकाला, प्रेम व्यक्त करताना, कधी ना कधी चंद्राने भुरळ घातलीच आहे. 

बर फक्त आपल्या प्रिय व्यक्तीचं कौतुक करण्यापुरतं हे मर्यादित असतं तरी ठीक होतं; पण चंद्राशी जवळीक इतकी वाढली की हळूहळू चंद्राशी तुलना करून, वर त्याला कमी लेखण्याचंही धाडस करू लागली हो माणसं! 'छुप गया बदली में जाके चांद भी शरमा गया...'  किंवा 'ए चांद, तेरी चांदनी की कसम, मेरे पास भी एक चांद है, तुझ में तो फिर भी दाग है, मेरा चांद तो बेदाग है'... किंवा मग, 'आसमाँ कहता है रब से, तुने चांद दो क्यों बनाए, एक में रखा है दाग, दुसरा है साफ साफ, सबकी नजर उस पे जाये, वो ही तो है, मेरी है वो ही तो, के जिसको देख देख चांद जलता है!' चांद जलता है? Seriously??? 🤭🤭🤭 पण प्रेम हो, प्रेम!! माफ करतो बिचारा तो चंद्र ही!! पण ह्याहून height म्हणजे, 'चांद से परदा किजीए, कहीं चुरा न ले चेहरे का नूर...' अरे???!!! म्हणजे सगळं जग ज्याच्या सौंदर्यामुळे वेडं होतंय, तो चंद्र ह्याच्या प्रेयसीच्या सौंदर्याची चोरी करणार??? 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️😂😂 पण पुन्हा तेच... 'प्रेम वेडं आणि आंधळं 😜 असतं' म्हणत असेल आणि गप्प बसत असेल बिचारा!! दया येते हो बिचाऱ्याची!! हे कमी म्हणून की काय, आपल्या प्रेयसीवर impression मारण्यासाठी, चंद्र तोडून आणायची भाषा करतात हो काही माणसं... 'तुम जो कह दो तो चांद तारों को तोड लाउंगा मैं...' "जवळ तरी ये, तुझं तंगडंच तोडून ठेवतो" असं काही म्हणत असेल का हो तो चंद्र? जाऊदे, आपल्याला काय? आपल्याला तरी नाही बा कुणी कधी असं काही म्हटलं... 😜

चंद्राला वेगवेगळ्या duties सुद्धा निभावाव्या लागतात बरंका!  'ए रात के मुसाफिर चंदा जरा बता दे, मेरा कुसूर क्या है, तू फैसला सुना दे' म्हणणाऱ्या कुणासाठी कधी judge होऊन, निर्णय द्यावा लागतो किंवा मग 'चंद्र आहे साक्षीला' अशी खात्री असणाऱ्यांसाठी कधी साक्षीदार व्हावं लागतं... 'चंदा ओ चंदा, किसने चुराई तेरी मेरी निंदीया, जागे सारी रैना, तेरे मेरे नैना' असं म्हणणाऱ्या एखाद्याचा 'हमदर्द' व्हावं लागतं... कधी कधी 'दमभर जो उधर मुँह फेरे, ओ चंदा, मैं उनसे प्यार कर लुंगी, बातें हजार कर लुंगी' अशी गळ कुणी घातली की, सगळं सगळं दिसत असूनही, 'मी नाही बघत, तुमचं चालू द्या' असं कबूल करावं लागतं 😜😜  तर कधी कधी 'धीरे धीरे चल, चांद गगन में' अशी एखाद्याची हळू हळू पुढे सरकण्याची फर्माईश पूर्ण करावी लागते!

पण एकाच वेळी, जर एक जण चंद्राला 'लवकर ये' म्हणत असेल आणि दुसरा 'नको येऊ' म्हणत असेल तर काय करावं बिचाऱ्याने? 'हम दिल दे चुके सनम' मध्ये नाही का, 'चांद छुपा बादल में' गाण्यात, करवाचौथचं व्रत करून भुकेने व्याकुळलेल्या बायकांना कधी एकदा चंद्र येतोय असं झालेलं असतं तर त्याच वेळी 'एकदा चंद्र आला की आपली प्रेयसी निघून जाईल' अशा भीतीमुळे सलमानला मात्र चंद्राने येऊ नये असं वाटत असतं! 'आजा रे आजा चंदा, तू लाख दुवाएं पायेगा' म्हणणाऱ्या बायका आणि 'ना, ना, चंदा तू नही आना, वरना सनम चला जायेगा' म्हणणारा सलमान ह्यात त्या चंद्राची किती अवघड अवस्था होत असेल बरं?! मला इथे कायम 'पडोसन' ची आठवण येते! त्यात, 'एक चतुर नार' गाण्यात नाही का, मेहमूद वैतागून म्हणतो, 'ये क्या रे घोडा-चतुर, घोडा-चतुर, एक पे रहना' 😂😂 तसं तो चंद्रही म्हणत असेल, 'अरे काय रे हे, "ये", "येऊ नको", "ये", "येऊ नको" लावलंय? एक ठरवा ना काय ते!!' 🤭🤭🤭 

स्वतःच्या बालपणात चंद्राला लाडाने मामा बनवून झालं, आणि तारुण्यात त्याच्या सौंदर्याला साक्षी ठेवून प्रेम व्यक्त करून झालं की पुढे आपल्या मुलांसाठी गाणी म्हणताना परत असतोच हक्काचा चंद्र!! स्वतः आई झाल्यावर, 'तुझे सूरज कहूं या चंदा, तुझे दीप कहूं या तारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा' म्हणणारा बाबा किंवा 'चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आंखों का तारा है तू' म्हणणारी आई ही रुपं हल्ली मला जास्त भावतात!! चंद्राचा हा असा संदर्भ सगळ्यात सच्चा वाटतो! माझ्या लेकाला तर 'चंदा है तू' गाणं प्रचंड आवडतं आणि कधीही ते गाणं कानावर पडलं की, असेल तिथून पळत येऊन, तो जेव्हा माझ्या गळ्यात पडतो, तेव्हा ते गाणं, चंद्राच्या सगळ्या गाण्यांपैकी, सगळ्यात जास्त जवळचं वाटतं मला - अगदी चंद्राला कवेत घेतल्यासारखं!! 😊😊

अर्थात, ही झाली आमची सामान्य माणसाची बुद्धी! पण आपल्या संतांनी चंद्राला ह्याहून खूप उच्च स्थानावर नेऊन ठेवलंय. 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, "चंद्र" व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर' अशा शब्दात संत गोरा कुंभारांनी पांडुरंगाला आळवलं आहे आणि अभिषेकी बुवांच्या आवाजात ती आळवणी ऐकली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. चंद्राकडे बघितल्यावर पांडुरंगाला आळवण्याची बुद्धी आपल्याला अगदी आतूनच होईल तो दिवस भाग्याचा! आणि तिथवर पोहोचण्याच्या प्रवासात कितीही 'ताप' असतील तरीही ते 'साध्य' गाठल्यावर लाभणारं कृपेचं चांदणं नक्कीच खूपच 'शीतल' असेल!!!


© रश्मी पानसे - नाझिरकर

Saturday, October 8, 2022

Distances do matter...

Is it really true that 'distances don't matter'?
With you close to me, life's way much better!!

It's not that I forget to breathe, without you,
Nor do I forget to eat, without you...
But food, with you, does taste much better... 
With you close to me, life's way much better!!

It's not that I don't smile without you,
Nor do I sit alone, without you...
But when close to you, my smile's much better...
With you close to me, life's way much better!! 

It's not that I skip my duties without you,
Nor do I just sit idle, without you... 
But with you by my side, I work much better...
With you close to me, life's way much better!! 

It's not that I don't communicate with you,
Nor have I lost contact with you...
But talking in person is very much better...
With you close to me, life's way much better!! 

Come let's have some food together,
Come let's have some laughs together...
Come let's fulfill our duties together,
Come let's share some talks together...

Let's be close, distances do matter...
With you close to me, life's way much better!! 


© Rashmi Panse - Nazirkar


Thursday, October 6, 2022

जीवनगाणे...

"आई, please गं... नुसतं उतरवूनच तर काढायचंय, please, गाणी ऐकत ऐकत करू मी? प्लीsssज??" अशी लेकाकडून येणारी फर्माईश वाढत चाललीय हल्ली; आणि 'आई' म्हटल्यावर 'अशा गोष्टींना पहिले नाहीच म्हणायचं असतं' 😜 हा अलिखित नियम follow करण्यासाठी थोडी चिडचिड करून, (का केल्यासारखी दाखवून? 🤔) मग 'उदारपणे' 😜 परवानगी देताना, मनात मात्र कुठेतरी मला खूप भारी वाटतं, माहितीये?!! कारण, माझा लेकही माझ्यासारखाच गाण्यांचा शौकीन होतोय ही गोष्ट मला खूप सुखावणारी आहे!! 

खरंच, मलाही कुणी माझा छंद विचारला तर माझं पहिलं उत्तर असतं - 'गाणी'!!! मग गाणी ऐकणं असेल, गुणगुणणं असेल किंवा काही cases मध्ये, गाणी बघणंही असेल... गाणी म्हणजे जीव की प्राण!!
'संगीत है शक्ती ईश्वर की, हर सूर में बसे है राम!' हे आता मला कितीही सुयोग्य वगैरे वाटत असेल तरी, असलं काही कळण्याच्याही आधीपासून, संगीत मला खूप म्हणजे खूप जवळचं वाटत आलंय. आणि खरंतर, मलाच काय, जवळजवळ प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या प्रकारचं संगीत भुरळ घालतच असणार - संगीताचा जिला अगदी तिटकाराच असेल अशी व्यक्ती बहुदा नसेलच... 

लहानपणापासून गाण्यांची एवढी आवड निर्माण होण्यात आणि, गळा असो ना असो, पण 'चांगला कान' तयार होण्यात माझ्या आई-बाबांचा वाटा नक्कीच मोठा आहे. खूप चांगली चांगली, वैविध्यपूर्ण गाणी खूप लहानपणापासून माझ्या कानावर पडत आली आहेत. ह्यात radio चा ही मोठा हातभार होता. आज खरंतर radio ची कितीतरी stations उपलब्ध आहेत पण आता पूर्वीसारखा radio ऐकलाच जात नाही, हे मात्र दुःख आहे. 

शाळेत असताना आईने गाण्याच्या class ला ही घातलं होतं - 'मी class ला जात होते' पेक्षा 'आईने घातलं होतं' हेच वाक्य जास्त बरोबर ठरेल, कारण त्या वेळी गाणी म्हणजे सुगम गीतं, भावगीतं, filmy गाणी असंच फक्त हवं असायचं. ताना, आलाप, चीजा, ख्याल वगैरे जवळचे वाटायचेच नाहीत फारसे... त्यामुळे classical शिकणं फार काही मनापासून व्हायचंच नाही आणि मग पुढे अभ्यास वगैरे वाढत गेल्यावर आपोआपच ते बंद ही पडलं. आता मात्र त्याबद्दल खूप खंत वाटते. आणि तरीही, आज मला कुठल्या रागात कुठले सूर आहेत वगैरे काहीही आठवत नसलं तरीही, ऐकताना मनाच्या तारा मात्र नक्की छेडल्या जातात!! ☺️☺️

गाण्यांच्या बाबतीत खरंतर नुसती आवड म्हणणं चूकच ठरेल, गाण्यांचं वेड आहे मला!! म्हणूनच, मला आठवतंय, माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या एका बहिणीने मला विचारलं होतं, 'त्याला पण गाण्यांची आवड आहे का गं, आपल्यासारखीच?' 🤭🤭🤭 म्हणजे, नवीन नातं जोडतानाही गाणं हा किती महत्वाचा मुद्दा होता!! 'जे वेड मजला लागले, तुजला ही ते लागेल का?' हे अशा अर्थाने असू शकेल असं आधी वाटलं नव्हतं हो! 😜
माझ्या लहानपणी मी आईला कायम 'एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख' गाणं म्हणून दाखवायला लावायचे, अगदी मुसमुसत का होईना पण मला ते गाणं ऐकायचं असायचं... आणि ईशानच्या लहानपणीही अगदी तेच घडलं!! माझं लेकरू हे गाणं ऐकताना मुसमुसायचं पण त्याला ते गाणं हवं असायचं!! तेव्हाचा आनंद काय सांगू!!! धन्य झाले हो मी!! 🥰🥰🥰 'जे वेड मजला लागले' ते माझ्या लेकालाही लागलंय बहुदा!! 

मला स्वतःला धांगडधिंग्यापेक्षा शांत, melodious songs जास्ती आवडतात. गाणी हळुवारपणे मनात झिरपत जावीत हे जास्त आवडतं मला! आणि त्यासाठी, music च्या जोडीलाच गाण्याच्या lyrics ला ही खूपच महत्व असतं. गाणं ऐकताना, नुसते त्यातले beats किंवा rhythm च ऐकण्याऐवजी अर्थ ही feel करत गेलो, तर ते गाणं नक्की जास्त भावतं!
अर्थात, कधी कुठलं गाणं मनाला स्पर्शून जाईल ह्याचे काही fix ठोकताळे मांडताच येणार नाहीत. मुळात, संगीत ह्या कलेचा आपल्या मनाशी, भावनांशी जास्त जवळचा संबंध असल्यामुळे आपल्या, त्या त्या वेळच्या, mood नुसारही आपल्याला वेगवेगळी गाणी जवळची वाटतात... एखादं खूप आवडणारं गाणं पण एखादे वेळी 'नको ऐकायला' असं वाटतं तर एखादं दुर्लक्षित गाणंही कधीतरी एकदम खास वाटून जातं! सगळे मनाचे खेळ!!

आपल्या नशिबाने, इतक्या मुबलक प्रमाणात आणि इतकी प्रचंड वैविध्यपूर्ण गाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत की आयुष्यातल्या, जवळजवळ, प्रत्येक प्रसंगाला साजेसं गाणं आपल्याला मिळू शकतं - मग तो आनंदाचा असो नाहीतर दुःखाचा. आनंदात असू तर आपला आनंद द्विगुणित करणारी गाणी आहेत आणि दुःखात असू तर त्यातून बाहेर काढणारीही गाणी आहेत! अपयश, नैराश्य ह्यांना कुरवळणारी गाणी जशी आहेत तशीच त्यातून बाहेर पडण्यासाठी उभारी देणारीही गाणी आहेत! आयुष्याला उत्सव बनवणारी गाणी आहेत तशीच मृत्यू साजरा करणारीही गाणी आहेत! आपण फक्त आपला कान तयार ठेवला की झालं!

मी म्हटलं तसं, प्रत्येक भावनेसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी गाणी असतातच आणि त्यात प्रेम आणि गाणी ह्यांच्या जोडीबद्दल तर क्या कहने!! 😄😄
आयुष्यात प्रेमाची entry होण्याआधीच, कुणीतरी असावं असं नुसतं वाटण्यापासून गाण्यांची साथ असते - "हमको आजकल है इंतजार, कोई आये ले के प्यार" आठवतंय ना?! किंवा मग, "कोई ना कोई चाहिये, प्यार करनेवाला..."
मग कुणीतरी आवडलंयसं वाटलं की तर विचारायलाच नको... किती ती स्वप्नील गाणी!! "दिल तेरे बिन कहीं लगता नही, वक्त गुजरता नही... क्या यही प्यार है?" अशी अधीर अवस्था!!
आणि समोरूनही "हां, यही प्यार है" असं उत्तर मिळून, एकतर्फीची गाडी proper रुळाला लागल्यावर तर बासच!! "हमें तुमसे प्यार कितना ये हम नही जानते, मगर जी नही सकते, तुम्हारे बिना..." 
काय ती धुंदी, काय ती जादू, औरच ते दिवस!! अगदी "आज मैं उपर, आसमाँ नीचे" अशी अवस्था... 
दोघांनी घेतलेल्या आणाभाका, कायम एकत्र राहण्याची वचनं... "वादा कर ले साजना, तेरे बिना मैं ना रहू, मेरे बिना तू ना रहे, होके ज्युदा, ये वादा रहा"...
मधेच थोडे रुसवे-फुगवे, मग मनवणं...  "तू रुठा तो मैं रो दुंगी सनम"... किंवा "कोई हसीना जब रूठ जाती है तो"...
मग दोघांनी मिळून बघितलेली स्वप्नं... "देखो मैने देखा है ये एक सपना, फ़ुलों के शहर में हो घर अपना"...
आणि मग काहीतरी फिस्कटलं की तर breakup songs ऐकलीच पाहिजेत - शास्त्र असतं ते! 😜😜😜 "दिल मेरा चुराया क्यों, जब ये दिल तोडना ही था... why did you break my heart???"
आठवडाभर तरी, 'देवदास' बनून, चुनचुनके तसली गाणी ऐकल्याशिवाय प्रेमभंग पूर्ण होतच नसतो!! 😂😂😂
मग परत 'जिंदगी', 'जीवन' वगैरे वाली philosophical गाणी ऐकून हळू हळू त्यातून बाहेर पडायचं... "रूक जाना नही, तू कहीं हारके, काटों से चलके मिलेंगे सायें बहार के!"
आणि मग परत "हे जीवन सुंदर आहे!" असं म्हणत डोळ्यांना परत आजूबाजूला हिरवळ दिसू लागते!! 😜😜😜
हे खरंतर खूप म्हणजे खूपच थोडक्यात मांडायचा प्रयत्न केलाय, ह्या विषयावर एक खास वेगळं article नक्की होऊ शकेल!! 😄

अर्थात, प्रेम हा विषय सोडूनही इतर कितीतरी गाणी, आपल्याला अगदी जवळची वाटावीत अशी असतात. भक्तीसंगीत, देशभक्तीपर गाणी, मैत्रीची गाणी, बालगीतं, अंगाईगीतं, गझल, कॅब्रे... कित्ती कित्ती प्रकार आणि कित्ती कित्ती गाणी... कधी उडते सूर तर कधी आर्त सूर... कधी वरची पट्टी तर कधी खोल खर्ज... कधी साधी सरळ तर कधी अवघड सुरावटींची... आणि मनापासून ऐकलंत तर जाणवेल की, शब्द, संगीत, आवाज ह्या सगळ्यांचा सुंदर मिलाप घडून आला असेल तर दोन ओळी ऐकूनही डोळ्यांमधून पाणी यायला लागतं - अगदी आनंदी गाण्यालाही हां - ती ते गाणं आपल्याला 'feel होण्याची', त्या कलेची परमोच्च अवस्था असते!! खूप म्हणजे खूप सुंदर भावना असते हो ती!! 🥰🥰🥰

आपलं आयुष्यही असंच तर आहे!! किती विविधता, किती अवघड जागा... कधी आनंद तर कधी आर्तता... कधी साधं सरळ तर कधी खूप किचकट... वरचे, खालचे, शुद्ध, कोमल सगळे स्वर लावावे लागतात आयुष्यात, पण तरीही, जेव्हा आपण जिद्दीने, सचोटीने, प्रामाणिकपणे सगळं हाताळतो, तेव्हा आयुष्याचं सुरेल गाणं बनून जातं!!
आपला पहिला स्वर आपल्या हातात नसतो, शेवटच्या स्वराच्या वेळी आपली अवस्था काय असेल, कुणास ठाऊक... पण ह्या दोन स्वरांच्या मधले सगळे सूर जर आपण मनापासून लावले, तर खरंच आपल्या आयुष्याची सुरावट नक्कीच श्रवणीय होईल!! आपण फक्त "जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे...!!"



Friday, September 9, 2022

डायरीतलं पान...

डायरीतलं पान...

कित्येssक वर्षांनी, काल, नवीनच मित्रमैत्रिणींचा एक नवीनच ग्रुप तयार झाला आणि खरंच सांगते, कसलं भारी वाटलं माहितीये!!! 'इतकी मजा गेल्या कित्येक काळात आपण केलीच नव्हती बहुतेक' असंच वाटतंय कालपासून... ह्यावर आता माझे आधीपासूनचे मित्रमैत्रिणी 'म्हणजे आम्ही वेडे!!!' types look देतील कदाचित मला 😜 पण अर्थात त्यांची त्यांची जागा आहेच अबाधित आणि तरीही ह्या नव्या ग्रुपने वेड लावलंय!! 😄😄

ग्रुप create झाल्यापासून मी जवळजवळ अखंडच whatsapp वर पडीक आहे आणि अखंड हसतेय!!! ईशानने तर नंतर नंतर चिडचिडच करायला सुरुवात केली. शेवटी 'तुला कसं तुझ्या मित्रमित्रमैत्रिणींबरोबर enjoy करायला आवडतं, तसं मी कधीतरी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर धमाल केली तर एवढं काय रे?' असा नेहमीचा dialogue त्याच्या तोंडावर चिपकवलाच 😜😜 अर्थात, तो ही माझाच मुलगा, त्याने काय लगेच भुणभुण थांबवली नाहीच... पण हे असं काय रोजरोज होणारे का ---- त्याचं? हळूहळू होईलच की त्याला सवय! 😜😜🙈🙈 

खरं तर, मजा अशीय की मी हा जो नवीन ग्रुप, नवीन ग्रुप म्हणतेय त्यातल्या कित्येकांबद्दल मला जवळजवळ काहीच माहिती नाही. कोण कुठे राहतं, काय करतं, वय काये, एवढंच काय, त्यातल्या कित्येकांची नावंही माहिती नाहीयेत मला. आणि तरीही पहिल्या मिनिटापासून हास्याचे फवारे उडतायत. अगदी जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा होतायत. चिडवाचिडवी तर अखंड!! हो, काही serious गप्पा पण होतात बरका!! आणि वाचन ह्या common धाग्यातून विणला गेलेला हा ग्रुप असल्यामुळे, वेगवेगळ्या कथांबद्दलच्या चर्चा ही असतात. All in all, a complete entertainment package!!! 😀😀 

थोडा विचार केल्यावर मला वाटलं की कदाचित कुणाची जास्त ओळख नसल्यामुळेच, उलट, हे इतकं छान गप्पाष्टक रंगलं असावं. कारण कुणालाच कुणाकडून काही अपेक्षा वगैरे नाहीत आणि आपली image वगैरे जपत बोलण्याचं काही botheration ही नाही... त्यामुळे फक्त आहे तो क्षण छान enjoy करणे एवढं एकच घडतंय आपोआप! 

ह्या ग्रुपमधले maximum members वयाने माझ्याहून लहानच असणारेत. पण मला कधीच कसलंच अवघडलेपण जाणवू दिलं नाही कुणीच... त्यामुळे मला खरंच young झाल्यासारखं, refreshed का काय म्हणतात तसं वाटायला लागलंय. (म्हणजे तशी अजून young च आहे म्हणा मी 😄😄 पण तरी....) अशा relaxation ची गरज प्रत्येकालाच असणारच!! किती दिवसांनी, एकटीशीच किती खदखदून हसलेय मी!! 

अर्थात, हे नवे संबंध कसे आता जन्मभरासाठी जोडले गेले वगैरे माझा काहीच दावा नाहीये. कदाचित हे नातं क्षणभंगुरतेचा शाप घेऊनही आलेलं असू शकतं किंवा, कोण जाणो, कदाचित ह्यातून जुळलेले काही बंध पुढे आयुष्यभरासाठी अगदी मजबूत होऊन राहतीलही... ह्या नात्याला काही भूतकाळ नव्हताच आणि भविष्यकाळात हे असेल की नाही हे ही मला माहित नाही, पण वर्तमानकाळ मात्र खुश करून टाकला एवढं नक्की!! 😊😊 Thanks friends for this wonderful, fun filled time!! ❤️❤️

चला, आता इथलं लिखाण खूप झालं, तिथे एव्हाना पाच एकशे msgs तरी पडले असतीलच!! सगळे वाचायचे म्हणजे खूप वेळ जातो रे बाबा!! 🤭🤭🤭 So, गेलं पाहिजे आता मला...

तळटीप: मी डायरी वगैरे मुळीच लिहीत नाही. पण असं लिहिल्याने कसं जरा वजन पडतं ना, उगीच एखाद्या famous व्यक्तीचं वगैरे लिखाण असल्याचं feel येतं, म्हणून आपलं उगीच.... 😜😜😜🙈🙈🙈


Wednesday, May 27, 2020

लफ़्ज़... (शब्द)

बस दो लफ़्ज़ हैं काफ़ी, किसीको हसानेके लिए,
या बस दो ही लफ़्ज़ कभी, दिल दुखानेके लिए,
बड़ी एहतियातसे कर इस्तेमाल इन्हें तू,
दो लफ़्ज़ हैं काफ़ी, ज़िंदगीका रुख़ बदलने के लिए...

                                                                     

असंच सुुुचलं म्हणून ह्याचंं भाषाांतर पण केेेलंय...


दोनच शब्दही पुरतात कधी, चेहेऱ्यावर हास्य फुलवायला,
आणि दोनच शब्द कधी पुरेसे, नयनी अश्रू आणण्याला,
तर मग जपूनच वापरू हे शस्त्र गडयांनो,
दोनच शब्द समर्थ कधी तरी, आयुष्य संपूर्ण बदलायला...


                                                           - रश्मी
                                                 (27/05/2020)

Sunday, May 24, 2020

ज़िम्मेदारी..

आईना-ए-दिल, हो जाए जब भी धुंधला,
निखारू उसे, ज़िम्मेदारी है मेरी..
मेरे दर्द की है, दवा मेरे अंदर,
समझके, निगलना, ज़िम्मेदारी है मेरी...

फिरुनी मी...

बंद मी होता घरात, शब्द अलगद मुक्त झाले,
कोंडलेल्या भावनांनी, रूप त्यांचे ल्यायले..
भाव माझेच, शब्दही अन, पण नव्याने भेटले,
काय जादू, की कृपा ही, मीच फिरुनी गवसले...

                                                               

Saturday, May 23, 2020

राह-ए-जन्नत

न जाने कितनी थी हसरतें, और कितनी ही ख़्वाहीशें,
आरज़ू थी अक्सर, पूरी हो मांगी हर मन्नत..
पर  झिझकसी होती है, जबसे सुना हैं,
ख़त्म हो ख़्वाहीशें जहाँपे, शुरू होती है राह - ए- जन्नत।।

                                                                

Thursday, May 14, 2020

जागतिक कुटुंब दिन..

जन्माला येतानाच आपण, जोडत असतो अनेक नाती,
विविध स्वभाव, मते विविध, कुटुंब धाग्यात गोवले जाती..

आई, वडील, भाऊ, बहीण, आज्जी आबांचा लळा,
आत्या, काका, मामा, मावश्या, मायेचा गोतावळा!

रक्ताची ही नाती सगळी, सुखदुःखातील सांगाती,
आणि जणू कुटुंबच होती, काही खास मैत्र, सखे-सोबती!

कुटुंब दिनी सदिच्छा, लाभो ह्या सर्वांना सुख परम,
पुढे जमेल का कधी आचरायला, 'वसुधैव कुटुंबकम्'?!

                                                            
                                                                

Wednesday, May 6, 2020

दुआ

यूँही, बिनबात, दर्द देते हैं जो दुसरोंको,
बदलेमें ख़ुदासे भी दर्द ही पाते हैं।
पर फ़ितरत तो देखो उन 'दुसरों'की,
दुआमें ऐसोंके लिये भी ख़ुशी ही मांगते हैं।।

                                                       

Tuesday, May 5, 2020

झुळूक..

अलवार झुळूक वाऱ्याची, अलगद घरात आली,
मुक्त वावर तिचा, ना तिला कुठलाही लॉकडाउन,
सुखद स्पर्शातून जाणीव 'त्या'च्या कृपेची दिली,
अन आली तशीच गेली, गात्र अन गात्र सुखावून...
  

Thursday, January 25, 2018

हम साथ साथ हैं!!

फेसबूक वरच्या एका समूहावर सध्या 'दिलेल्या पूर्वार्धावरून गोष्टीचा उत्तरार्ध लिहीणे' असा 'कथापूर्तीचा' उपक्रम सुरू आहे. त्यापैकी एक कथा पूर्ण करण्याचा केलेला हा प्रयत्न...

पूर्वार्ध:-

मयंक आणि चेतन खूप वेळ किनाऱ्यावर बसून होते. गेले कितीतरी तास दोघांचे वाद चालू होत आणि आता अगदी भयाण शांतता होतीे. त्या वादाचा आणि आताच्या शांततेचा साक्षीदार असलेला सूर्य आता डुबायला आला होता.

खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांना हळूहळू लक्षात आलं होतं की आपण दोघेही पायलवर प्रेम करतोय. पण त्या तिघांच्या पक्क्या मैत्रीमुळे दोघेही गप्प होते. एकमेकांना आजमावत होते. पायलचा अंदाज दोघांनाही येत नव्हता. कॉलेज संपून आता तिघेही आपापल्या कामाला लागले होते. तिघेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जम बसवू लागले होते. तिघांचीही आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्तर सारखाच होता.

कॉलेजमध्ये खूप धमाल तिघांनीही केली होती. एकत्र सहलीला गेले होते, सिनेमे, नाटके पाहिली होती,  प्रत्येक गोष्ट एकत्र केली होती. अगदी व्हाट्सअप्प गृप व्यतिरिक्त पर्सनल मेसेज सुद्धा केले नव्हते कधीच. एवढी तिघांमध्ये unity होती.

पण आज अचानक जेव्हा पायलच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा दोघांनाही, खरंतर तिघांनाही ती कल्पनाच सहन झाली नाही.

पायलला देखील कळत होते की दोघेही तिच्यावर प्रेम करतायत जीवापाड. तिलाही दोघे अगदी चांगले मित्र म्हणून आवडत होते. पण तिला कळत नव्हते की आपल्याला नेमकं दोघांपैकी कोण आवडतं ? दोघेही तिच्या जीवनात एकाच वेळेस आले होते. दोघेही तितकेच तडफदार, हुशार, स्मार्ट. एखाद्याला पाहून त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होणे या स्टेजच्याही आधीच तिला तिच्या मैत्रिणीकडून कळलं होतं की ते दोघेही तिच्यावर प्रेम करतायत जीवापाड. शलाकाला जे कळलं ते पायलला स्वतःहून कळलंच नव्हतं इतकी ती त्यांच्या मैत्रीत गुंगून गेली होती.

आपल्याला कोणाचे आकर्षण वाटते या विचारापाशी येऊन ती थबकायची. तिला आता मैत्री आणि प्रेम यातील फरकच कळेनासा झाला होता. विचार करून करून डोकं शिणून गेलं होतं. तिघांचे गृप फोटो सतत पाहून पाहून वेड लागायची पाळी आली होती तिच्यावर.  

रात्रीचे 8 वाजले तरी nearby app मध्ये दोघांची लोकेशन्स जुहू बीच दिसत होती.

ती तडक उठली, कपडे बदलले, तिची scooty काढली आणि निघाली.

मयंक आणि चेतन दोघांनाही नोटिफिकेशन आले "payal pradhan is nearby ..."

उत्तरार्ध:-

तशी पायल थोडी फिल्मी म्हणता येईल अशीच होती. त्यामुळे गेल्या काही दिवसात तिने 'मुझसे शादी करोगी', 'साजन', 'हम दिल दे चुके सनम' वगैरे किती तरी वेगवेगळ्या movies मधले वेगवेगळे scenes स्वतःच्या आयुष्याशी जोडून पाहिले होते! आत्ताही तिला समोर तराजूच्या दोन पारड्यांमधे तिचे दोन लाडके मित्र उभे असल्यासारखे दिसत होते..
चेतन एकदम संयत, थोडासा अबोल कडे झुकणारा, कुठल्याही गोष्टीचा अगदी सर्व बाजूंनी विचार करणारा तर मयंक एकदम उत्कट, 'on an impulse' म्हणतात तसं काहीसं जगणारा - पण तरीही थिल्लर नक्कीच नाही.. सगळ्यात मुख्य म्हणजे दोघंही तिला जीवापाड जपणारे!! 'असे मित्र मिळायला खरंच भाग्य लागतं,' तिच्या मनाने तिला पुन्हा एकदा सांगितलं; 'आणि म्हणून तर त्यातल्या कुणाही एकाला दुखावणं आणि दुसऱ्याला निवडणं हे खूपच अवघड आहे,' तिनेही मनाला ठणकावून सांगितलं.. तिने काहीतरी ठरवलं तर होतं पण आता ते दोघं काय म्हणतायेत यावर सगळं काही अवलंबून होतं..

'Wassup guys? Anything serious?' पायलने पोहोचल्यावर लगेच मोर्चेबांधणी सुरू केली. 'काही बोलायचंय का तुम्हाला माझ्याशी? मला तरी तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय बा. जाऊदे, मीच बोलते.' जे ठरवलंय ते एकदा लवकर बोलून टाकायचं tension असल्यामुळे कुणालाही बोलायचा chanceच न देता पायलने सभा स्वतःच्या हातात घेतली..

'तर my dear friends, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की तुमच्या मनात काय चाललंय याची, तुम्ही सांगितलं नसलं तरी, मला पूर्ण कल्पना आहे. आणि खरं तर ना, मला पण तुम्ही दोघंही खूप आवडता रे! आपलं tuning पण कसलं भारीये!! पण 'life partner' म्हणून कुणाची निवड करावी हे खरंच मला काहीच कळेनासं झालंय.. after all, मैत्री वेगळी आणि लग्न वेगळं, नाही का? तर, असं confusion असल्यामुळे,  निवड करण्यासाठी, मी एक वेगळा निर्णय घेतलाय...'

'काय स्वयंवर वगैरे रचून आम्हाला एखादा पण बिण पूर्ण करायला लावणारेस की काय?' मयंकने विचारलं.

तसं त्याला एक चापट मारत पायल म्हणाली, 'गप रे.. मी ठरवलंय की मी तुम्हा दोघांबरोबर काही दिवस 'live-in' मधे राहून बघायचं - 'चि. व चि. सौ. कां.' सारखं रे - अन मग आपलं उत्तर आपल्याला आपोआपच मिळेल...' कसंबसं वाक्य संपवून पायलने दोघांकडे एक चोरटा कटाक्ष टाकला.. आता समोरून काय येतंय या विचाराने तिचे प्राण तिच्या कानांत गोळा झाले!

थोडा वेळ एक विचित्र शांतता पसरली. नेहेमी खूप चटकन react होणारा मयंक नुसतंच तोंड उघडून परत शांत झाला. नेहेमी विचार करून, वेळ घेऊन बोलणाऱ्या चेतनने मात्र यावेळी फार वेळ न घेता लगेच बोलायला सुरुवात केली, 'पायल, मला हा प्रस्ताव मान्य नाही.'

काहीतरी बोलायसाठी तोंड उघडलेल्या पायलला थांबवून चेतन पुढे म्हणाला, 'पायल, तुला already कळलंच आहे म्हणतीयेस तरी आज मी सांगतो की "हो, मला तू खूप आवडतेस- मैत्रीच्या पलीकडे जाऊन - आणि मला तुझ्याशी लग्न करायला मनापासून आवडेल," पण तरीही मला तुझा हा प्रस्ताव मान्य नाही.  आयुष्य म्हणजे movie नव्हे पायल. मुळात मला हा 'live-in' चा पर्याय कधीच पटला ही नाही आणि आवडलाही नाही. शिवाय, तू ज्या movie चा reference देतीयेस त्यात ती एकाच मुलाबरोबर राहिली होती. इथे तू दोघांबरोबर रहायचं म्हणतीयेस.. सोप्पं वाटतं का तुला सगळं? आपल्याकडे समाजात अजूनही याला फारशी मान्यता नाही; त्यात तू थोडे दिवस एका मुलाबरोबर अन मग नंतर थोडे दिवस दुसऱ्या बरोबर राहून 'बघणार'.. तुला वाटतं आपला समाज हे accept करेल? तू म्हणशील कदाचित की मला समाजाची पर्वा नाही पण लोकांनी तुला नावं ठेवलेली मला नाही आवडणार गं.. कारण माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे..'

'अरे पण,' पायलने बोलायचा प्रयत्न केला पण चेतनला अजून खूप बोलायचं होतं. तो म्हणाला, 'बरं, समज, तुला या प्रयोगानंतर आम्हा दोघांपैकी कुणाच बरोबर कायमचं राहावंसं नाही वाटलं तर? आमच्या दोघांपैकी कुण्या एकाचा तू स्वीकार केलास तर तो कदाचित तुझं दुसऱ्या बरोबर 'राहून बघितलेलं असणं' समजून घेईलही; पण दोघांनाही निवडलं नाहीस तर तिसराच कुणी तुला तसंच समजून घेईल? आहे तुला ती खात्री?'

'आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या बरोबर राहून बघितल्या नंतर ज्या अर्थी एकाला तुला reject करावंसं वाटेल  त्या अर्थी तुझं अन त्याचं कमी पटेल; मग नंतर ही मैत्री अशीच टिकून राहू शकेल? मी तरी खरंच हे सहन नाही करू शकणार गं..
So, better way, मी तुला suggest करतो की तू मयंकशी लग्न कर.. माझ्यासाठी तुम्हा दोघांचीही मैत्री खूप महत्त्वाची आहे आणि मला ती आयुष्यभर हवीये.. so, नंतर काहीतरी न पटून एकमेकांपासून कायमचं लांब जाण्यापेक्षा आज प्रेमात माघार घेऊन मैत्री जपायला मला आवडेल..'

पहिल्यांदाच चेतन इतकं बोलला असेल.. त्याला आलेला ताण त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत असला तरी आता तो बराच शांत झाला होता..

'तोडलंस मित्रा!' मयंक घोगऱ्या आवाजात म्हणाला. त्याचे डोळे चक्क पाणावले होते. 'पायल, आता प्लीज माझं म्हणणं ऐक. मी मनापासून सांगतोय की चेतन हाच तुझ्यासाठी right choice आहे! खरंच चेतन, तुझ्या त्यागाची परतफेड करण्यासाठी नाही पण तुझं बोलणं ऐकल्यावर मला जाणवलं की मी इतका विचारच केला नाही; rather पायलने तिचं proposal मांडल्यावर पहिल्यांदा तर मला पण भारीच idea वाटली ती! त्याच्या पुढच्या सगळ्या परिणामांबद्दल एवढा विचारच आला नाही माझ्या मनात.. पण स्वतःचं प्रेम नाही मिळालं तरी चालेल पण ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिचा जास्ती विचार करणे हेच तर खरं प्रेम! पायल, मैत्रीसाठी माझ्यासारखं हाहाहीही ठीके पण आयुष्यभरासाठी चेतन सारखी mature साथ च हवी.'

'मयंक, तू उगाच स्वतःला काहीतरी नावं ठेवू नकोस हां,'  पायल आणि चेतन एकत्रच म्हणाले.

'बघा, तुमचे विचार पण किती जुळतायेत!' मयंक हलकंसं चिडवत म्हणाला. 'यार, माझ्यासाठी आपली ही मैत्रीच खास आहे! अन प्रेमाच्या आघाडीवर पायल अन चेतन कडून थोडंसं दुःख मिळाल्यासारखं वाटलंच पहिले काही दिवस तरी सांभाळून घ्यायला मित्र म्हणून पायल अन चेतन आहेतच की!! हम लोग तो हमेशा साथ ही रहेंगे!! So guys, I am really happy for you!! मग, पायल, शोले मधल्या अमिताभ सारखं, चेतन च्या वतीने लग्नाची बोलणी करायला कधी येऊ?'
सगळ्या मित्रांच्या खळखळून हसण्यात एवढ्या दिवसांची tensions कुठल्या कुठे पळून गेली!

मागे कुठल्याशा स्टॉल वर गाणं लागलं होतं, 'यारों, दोस्ती बडी ही अजीब हैं.......'