Saturday, May 13, 2017

माणुसकी गमावलेला माणूस...

कालच्या पेपर मधे एक बातमी वाचली. 'नाशिक जवळ कुठेसा एक अपघात झाला तेव्हा रस्त्यावर जमलेल्या लोकांनी जखमींना मदत करण्याऐवजी अपघातग्रस्त गाडीतले काही लाखांचे आंबे पळवले. जखमी विव्हळत पडले असताना, त्यांना उपचारासाठी न्यायच्या ऐवजी, आपल्या घरी जास्तीत जास्त आंबे कसे नेता येतील यासाठी सर्व जमलेल्यांमधे चढाओढ लागली होती.' वाचून काही क्षण तर मन सुन्न झालं, बधिर झालं. कुठे चाललोय आपण? माणूस म्हणजे 'माणुसकी' नसणारा प्राणी अशी व्याखा हल्ली बनत चाललीये की काय? काल ती बातमी वाचल्यापासून चीड, खंत, हतबलता, अस्वस्थता अशा विविध भावनांनी मनात ठाण मांडलंय.

खरंच, माणूस इतका स्वार्थी झालाय का? समोर एखादा माणूस जखमी होऊन, वेदनेने तळमळत पडलेला असताना त्याचं काहीही वाटू नये इतक्या प्रमाणात संवेदना मेल्यात का माणसाच्या? आंबे चोरले ही तर वाईटच गोष्ट आहे आणि त्याचं समर्थन होऊच शकत नाही; पण मी म्हणते, चोरायचेच होते तर आधी किमान त्या जखमींना मदत तरी करायची.. पण असं कसं करणार? त्यांना मदत करून येईस्तोवर इकडे आंबे संपले तर? त्यापेक्षा, ते गोळा करेपर्यंत एखाद्या जखमीचा जीव गेला तर त्यात काय एवढं?

स्वतःला हलकीशी सुई जरी टोचली तरी कळवळणाऱ्या माणसाला दुसऱ्या माणसाच्या वेदनांची जराही जाणीव असू नये? मग माणसात अन पशुमधे काय फरक? अर्थात हे म्हणणं ही काही बरोबर नाही कारण निसर्गाकडे नीट लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येईल की प्राणी पक्षी सुद्धा आपल्यातल्या इतरांना काही झालं तर अगदी अस्वस्थ होतात आणि जमेल तशी अन तेवढी मदत करायचा प्रामाणिक प्रयत्न तरी करतात.. अर्थात, आपण फक्त असे काही videos मिळाले तर ते फॉरवर्ड करणार!!

'दुसऱ्या माणसातही माझ्याप्रमाणेच परमेश्वराचा अंश आहे त्यामुळे त्याच्या वेदनेच्या जाणिवेने माझं मनही दुखावलं पाहिजे' वगैरे उदात्त विचार राहूदेत एक वेळ पण किमान 'उद्या माझ्यावरही ही वेळ आली आणि कुणीच मला मदत करायला आलं नाही तर?' एवढ्या स्वार्थी विचाराने तरी माणसाने दुसऱ्याच्या गरजेच्या वेळेस पुढे व्हायला काय हरकत आहे? अशा वेळी मात्र स्वार्थ बाजूला!

माणूस म्हणजे काय याच्या अनेक व्याखा आहेत त्यापैकी एक अशी ही आहे की 'ज्याला आपल्यासारख्याच इतरांच्या संवेदना जाणवतात तो माणूस!' या व्याख्येनुसार पाहिलं तर आजकाल 'पृथ्वीवर माणूस विरळाच' असंच म्हणावं लागेल बहुदा!! खूप पूर्वीपासून आपल्याकडच्या संत महात्म्यांनी सांगितलंय की 'दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यासाठी, त्याचे दोष पाहण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात कधीच नाक खुपसू नये पण दुसऱ्याच्या गरजेला मात्र कायम पुढे असावं.' संतांनी स्वतः तसं आचरून पण दाखवलंय. पण आज आपलं बरोबर उलटं झालंय - इतरांचे दोष बघायला अगदी पुढे आणि मदतीला मात्र मागे! प्रचंड आत्मकेंद्रीत झालोय बहुदा सगळे..

याचा अर्थ या जगात माणुसकी उरलीच नाहीये किंवा प्रत्येक जण टोकाचा स्वार्थी झालाय असंच पण नाही म्हणता येणार. कित्येकदा, अपेक्षा ही नसताना, आपल्याला माणुसकीचं दर्शन घडवणारे काही अतिशय चांगले अनुभव येतात! चांगले लोक आहेत म्हणून तर जग टिकून आहे. फक्त त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. इतरांचं काय असेल ते असो, पण मी स्वतः तरी त्या कमी लोकांपैकी एक असेन हे बघणं हे माझं कर्तव्य आहे... 

1 comment:

  1. कटु वास्तव! अशी उदाहरणे ढिगानी दिसतात, पण मदतीची, माणूसकीचे दाखले अपवादाने आढळतात. म्हणूनच त्याच्या पोस्टस् होतात. आता संवेदना हि फक्त मेसेज/पोस्टस् fwd करण्यापुरती शिल्लक राहिली आहे, प्रत्यक्ष कृती तर दुर्लभच.

    ReplyDelete