सध्या, फेसबुक वरच्या आमच्या एका समुहावर 'काव्यमय समस्यापूर्ती' असा एक उपक्रम सुरु आहे. पूर्वी, राजे-महाराजे आपल्या पदरी असलेल्या कवींच्या बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी हा प्रकार करत असत. कवींना एखादी ओळ देऊन, त्यावरून साधारण चार ओळींची तरी काहीतरी रचना करायला सांगितली जात असे. त्याच धर्तीवरचा आमचा हा प्रयोग! त्या उपक्रमा अंतर्गत मी केलेल्या कविता (खरं तर कवितांचा प्रयत्न) इथे पोस्ट करत आहे.
समस्यापूर्तीसाठीची पहिली ओळ होती -
"मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?"
त्यावरुन मला सुचलेल्या ओळी -
दिवस संपता संधिकाल, येते तद्नंतर निशा..
टिकत नाही ती ही कायम, पुन्हा दिवस, नव्या आशा..
अविरत चक्र चालूच राही, 'सातत्य' नियम निसर्गाचा...
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?
थांबवू शकला का कुणी खेळ उदय-अस्ताचा?
थांबवू शकला का कुणी प्रवास त्या 'मित्राचा'?
हारू नको, चल ऊठ, वाहुदे प्रवाह जीवनगंगेचा,
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?
No comments:
Post a Comment