Sunday, November 6, 2022

नित्य दिवाळी!!

येणार, येणार; आली, आली म्हणता म्हणता दिवाळी येऊन गेली सुद्धा...

आणि हे ह्याच वर्षीचं नाही, तर दर वर्षीचं आहे. कित्ती आधीपासून दिवाळीचे वेध लागत असतात!! म्हणजे खरंतर, नवीन वर्षाचं calendar आल्या आल्याच, पहिले, 'ह्या वर्षी दिवाळी कधीये?' हे बघणारे माझ्यासारखे बरेच असतील. पण ती आली की भरकन संपूनही जाते... नुकतीच दिवाळी होऊन गेलीय हे दर्शवणाऱ्या उगाच चार दोन किरकोळ खुणा तेवढ्या मागे राहतात... दारात दिमाखात उभा असलेला, पण हळूहळू पडझड व्हायला लागलेला, किल्ला... 'हो, हो, उद्या नक्की काढतो' म्हणत नवऱ्याने तसंच ठेवलेलं दारावरचं lighting आणि आकाशकंदील... (दिवाळीतल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने केलेली रोषणाई, direct इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावरच निघते बरेचदा 😜😜) डब्यांमधून उरलेले फराळाचे पदार्थ... (हो, हे लिहीत असताना ते डबेही जाणीव करून देतायत मला की 'नवऱ्याचं lighting चं काम जसं pending आहे तसंच तुझंही हे नंतरच्या आवराआवरीचं काम राहिलंच आहे' 😔😔) लेकाच्या फटाक्यांपैकी, नंतर match जिंकल्यावर वगैरे फोडण्यासाठी म्हणून ठेवलेले थोडेफार फटाके... एव्हाना बऱ्यापैकी संपत आलेला 'मोती' साबण... बाहेरून कुठेतरी लांबून, मधेच येणारे फटाक्यांचे आवाज... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी संपली तरी सुट्टी संपली नसल्यामुळे घरात चालू असणारा धिंगाणा... 

 

आपल्याकडे इतके विविध सण असले तरी दिवाळी म्हणजे सगळ्यात लाडका सण - अगदी लहानपणापासून. बहुतेक सगळ्यांचंच असावं असं. अर्थात वय वाढल्यामुळे आणि बदललेल्या भूमिकांमुळे, उत्साहाची level पण बदललीय आताशा. कारण लहानपणी काय, सण साजरा करण्याचे सगळे कष्ट तर आईबाबांनीच घेतलेले असायचे. आम्ही म्हणजे नुसतं, 'खाओ पीओ, मजा करो'! आईने बिचारीने खपून बनवलेला फराळ हाणायचा, बाबांनी आणून दिलेले फटाके, दादाच्या मागे मागे करत फोडायचे, नवीन कपडे घालून मिरवायचं, बास!! पण आता आईची भूमिका माझ्याकडे आल्यामुळे, ती खपून फराळ बनवणारी 'बिचारी', मी असते! 😜😜 मग आपोआपच लहानपणच्या निष्काळजी, निवांत उत्साहाला, जबाबदारीचा break लागतोच ना! 😂😂 

 

तर ह्या फराळाची एक वेगळीच तऱ्हा! दिवाळी आली आणि फराळाचा विषय सुरू झाला की दरवर्षीचा एक ठरलेला dialogue म्हणजे, 'हेss उगीच आपलं मरमरून इतकं सगळं बनवायचं आणि शेवटी संपवताना मारामार'! आणि दर वर्षी असंच म्हणत म्हणत, परत फराळ मात्र बनवायचा सोडायचा नाही! 🤭🤭 त्यात दरवर्षीचा अनुभव असला तरी नवरा सांगणार, 'भरपूर बनव हां काय ते, उगीच एवढं एवढंसं नको 🙄🙄, कुणाकुणाला द्यायला वगैरे कमी नकोय पडायला..' नाही, ते कुणाकुणाला दिलं जातं हे खरंय, पण ते 'कुणीकुणी' पण देतातच की आपल्याला!! पण नाही! बायकोचं पटवून घेतलं तर त्सुनामी नाही येणार?? 😏😏 आणि पहिल्याच दिवशी ह्याचा स्वतःचा, फराळाचं खाण्याचा उत्साह निम्म्यावर आलेला असतो. पण काय करणार? 'नवऱ्याला खुश ठेवण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो' वगैरे तद्दन फिल्मी dialogues चा पगडा असल्यामुळे, खपते 'बिचारी'! 😜😜

 

ह्या फराळाच्या पदार्थांचं ना, आपल्या आयुष्यासारखं असतं, किनई? आपल्याला हव्याहव्याशा गोष्टी चटकन संपून जातात. म्हणजे आपला तसा स्वभावच असतो; आवडणाऱ्या, हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टींनाच preference देण्याकडे आपला कल असतो आणि जरा कमी आवडत्या गोष्टी आपण उगाचच मागे टाकत राहतो - भले नंतर तरी त्या आपल्यालाच पूर्ण करायच्यात हे माहीत असूनही... पण अशाने, शेवटी, नकोशा वाटणाऱ्या गोष्टी एकत्र साठून राहतात आणि आपल्यालाच त्या संपवाव्या लागतात. फराळाच्या बाबतीत किमान, अगदीच आपल्याला खपलं नाहीच, संपलं नाहीच तर, शेवटी, आपल्या घरी येणाऱ्या मावशींना वगैरे देऊन तरी टाकू शकतो आपण एकवेळ; पण आयुष्याच्या बाबतीत मात्र तसं नसतं ना boss! My life, my sufferings : non-transferable! 

 

फराळासारखीच अवस्था कपड्यांचीही! बरेचदा, घ्यायचे म्हणून नवीन कपडे घेतले जातात; पण नंतर, कपाटातून ओसंडून वाहणाऱ्या आधीच्या कपड्यांना 'sharing' शिकवून, नव्या कपड्यांसाठी जागा करून द्यायला लावावी लागते; नाहीतर जुमानत नाहीत अहो ते! 😜😜

पणत्यांचीही तीच गत... जितक्या जास्त पणत्या मांडू, तेवढं सुंदर दिसतं म्हणून मारे उत्साहाने जास्तीत जास्त पणत्या लावल्या जातात; पण दिवाळी संपली की त्यांची सगळी उस्तवार करावी लागते. 

उटणी वगैरे संपवावी लागतात, तेला-उटण्यासाठी काढलेल्या चांदीच्या वाट्या नीट आत ठेवून द्याव्या लागतात. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे 2-3 दिवस आणि कदाचित पुढचेही काही दिवस जी वेगवेगळी खादाडी होते, तिच्या पार्श्वभूमीवर शरीराला पण मुश्किलीने 'normal' वर आणावं लागतं... 🙈🙈

 

म्हणजे प्रत्यक्ष दिवाळी तर 2 नाहीतर 3 दिवसात निघूनही जाते; पण मागाहून करण्यासाठी कामांची list मात्र ठेवून जाते. आणि तरीही ती आपल्याला इतकी हवीहवीशी का बरं वाटत असेल? कारण, येण्याच्या आधीपासून, प्रत्यक्ष असताना आणि गेल्यावरही ती आपल्याला एक नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवा प्रकाश देऊन जाते! कुठल्या ना कुठल्या आठवणींच्या रूपाने कित्येक दिवस आपल्या मनात रेंगाळत राहते! नात्यांमधली वीण घट्ट करून जाते! 

 

एखादी गोष्ट आपल्याला कितीही हवीहवीशी वाटली, तिच्यासाठी आपण कितीही मेहनत घेतली असली, तरीही ती काही कायमसाठी रहात नाही, ती मागे सोडून आपल्याला पुढे जावंच लागतं. दिवाळीसाठी कितीही खपून, कितीही मोठी, कितीही सुंदर रांगोळी काढली आणि ती भले आपल्याला कितीही आवडली, तरी दुसऱ्या दिवशी ती पुसून टाकावीच लागते ना, तसंच... 

आणि ह्याचीच दुसरी बाजू अशीही आहे की एखादी गोष्ट कायमसाठी राहणार नाहीये म्हणून 'जाऊदे ना, काय दोन दिवसांसाठी एवढं करत बसायचं?' असं म्हणत, तिच्यासाठी कष्टच घेतले नाहीत असंही करून चालत नाही. नाहीतर आपल्याला कशातूनच आनंद मिळणार नाही. त्या त्या वेळचे कष्ट सुद्धा एक वेगळं समाधान देऊन जात असतात. त्या त्या क्षणाचा आनंद देत असतात! 

 

दिवाळी हा प्रकाशाचा सण! दुरीताच्या, नकारात्मकतेच्या तमावर मात करण्याचा सण! आपले सगळे प्रश्न, तात्पुरते का होईना, बाजूला ठेवून, आनंद घ्यायची आणि द्यायची शिकवण आपल्याला दिवाळी देते. आणि मग, अशा पद्धतीने, कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगात गुंतून न पडता, येईल तो क्षण साजरा करणं जर आपल्याला जमायलाच लागलं, तर आपल्याकडे तर 'नित्यच दिवाळी' होईल, नाही का??? 🪔🪔🪔

 

 

© रश्मी पानसे - नाझिरकर

 

 

 

 

7 comments: