Wednesday, February 22, 2017

सोशल लाइफ...

काल कुठेशी एक बातमी वाचनात आली - 'कित्येक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या  मृत्यूच्या बातमीने त्यांच्या ट्वीटर खात्यावर पडला RIP चा पाऊस!' इतर कुठेच ही बातमी नव्हती आणि tv वर पण काही नव्हतं त्यामुळे जरा आश्चर्यानेच मी पुढे वाचायला लागले. तर, त्या बातमीत लिहिलं होतं की कुठल्याशा social site वर काही चुकीने फरीदा जलाल यांच्या प्रोफाईल खाली त्यांच्या जन्म तारखेबरोबरच मृत्यूची तारिख पण दिली होती आणि ती कालचीच होती आणि ते बघून लोकांनी RIP चा अक्षरश: पाऊस पाडला होता. नंतर कळलं की फरीदा जलाल अगदी व्यवस्थित आहेत! म्हणजे अगदी 'आपुले मरण पाहिले म्यां डोळा' अशी अवस्था अनुभवली असेल नाही जलाल बाईंनी?!! मला आठवतंय, अगदी लहानपणी, जेव्हा मरण हि संकल्पना नुकतीच माहिती होऊ लागली होती तेव्हा, मला वाटायचं की आपण मेलं तरी हळूच डोळे उघडून बघता यायला हवं आपल्याला मधेच; म्हणजे आपल्यासाठी कोण किती रडतंय वगैरे बघता येईल आपल्याला! आज ते भाग्य फरीदा जलाल यांना लाभलं बुवा!! आणि हे असं भाग्य लाभलेल्या त्या काही पहिल्याच नाहीत बरं. गेल्या २-३ वर्षांत, शक्ती कपूर, राजपाल यादव यांसारख्या अजूनही काही celebrities च्या बाबतीत असे किस्से घडले आहेत. भाग्यवानच नाही हे सर्व? लोक आपल्यावर किती 'प्रेम' (?) करतात ते यांना 'याची देही याची डोळा' बघता आलं.. 

हे विनोदी नाहीये खरं तर. Social media नावाचं एक वादळ दिवसेंदिवस जास्त जास्तच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करायला लागलंय. या वादळाने उडवलेली धूळ डोळ्यात - आणि डोक्यातही - गेल्यामुळे , आता आपण नक्की कुठे चाललोय किंवा काय करतोय हे बहुतेक कुणाला कळेनासंच झालंय. त्यामुळेच बहुदा, आपण कुठे काय reaction देतोय, आपण जे फॉरवर्ड करतोय ते खरंच खरं आहे की नाही, त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात याचा साधा विचार करायचं भानही अनेकांना राहिलेलं नाही. आला काही मेसेज की कर Whatsappवर १०० जणांना फॉरवर्ड नाहीतर टाक फेसबुकवर.. दुर्दैवाने, या 'डोकं गहाण टाकून नुसतं येईल ते फॉरवर्ड' करण्याच्या नादात माणसांची ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी हरवत चालली आहे. कारण कितीशी माणसं स्वतः काही विचार करून, लिहून वगैरे पोस्ट करतात? 'बस ईधरका माल उधर'!!

सुरवाती सुरवातीला, एकमेकांपासून दूर गेलेल्या माणसांना जवळ आणण्यासाठी कौतुकपात्र ठरलेल्या या social media चा आता खरोखर अतिरेक झालाय. आता ते दूरचेच इतके जवळचे वाटू लागलेत की खरे जवळचे नजरेआड होत चाललेत. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी धडपणे बोलायलाही वेळ नसणाऱ्या माणसांकडे virtual जगतात इतकं ऍक्टिव्ह असायला वेळ कसा असतो हे एक आश्र्चर्यच आहे. अनेक दिवसांनी एकत्र आलेली बहिण-भावंडं, मित्रमंडळी जेव्हा समोरासमोर एकमेकांशी बोलून, मनाने जास्त जवळ येण्याऐवजी एकाच खोलीत बसून, पण आपापल्या मोबाईल्स मधे डोकी खुपसून, त्यावरच्या कुठल्याशा ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी बोलताना (?) दिसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते खरंच! म्हणजे आपण ज्या व्यक्तीशी virtual माध्यमातून बोलत आहोत ती स्वतः, प्रत्यक्ष, आत्ता या क्षणी आपल्या समोरच आहे आणि आपण तिच्याशी फेस -टू-फेस पण बोलू शकतो हेही विसरायला होत असेल माणसाला? आणि मग त्यातूनच 'नवरा, जेवणाच्या टेबलवर समोरच बसलेल्या बायकोकडे पोळी पण Whatsapp वरूनच मागतोय' अशा प्रकारचे jokes (?) तयार  होतात आणि मग काय? ते पण हजारोंना फॉरवर्ड!!

आपल्या आयुष्यात घडणारी अगदी छोट्यात छोटी आणि खरं तर ज्याने दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही अशी प्रत्येक घटना social websites वर टाकून पब्लिसिटी मिळवायचं व्यसनच जडलंय हल्ली कित्येकांना.. मग मतदान केल्याचे photos टाकणं म्हणजे तर फारच 'important' गोष्ट! आपण आपलं एक बेसिक कर्तव्य पार पाडलंय हे कळायला नको का जगाला?! कुठल्याही प्रेक्षणीय ठिकाणी जा, माणसांना ते स्थळ, तो परिसर डोळ्यात साठवून घेण्यापेक्षा स्वतःची छबी कॅमेऱ्यात साठवण्यातच जास्ती इंटरेस्ट असतो. आणि मग लगेच त्या छब्या जातात फेसबुकवर. म्हणजे प्रत्यक्ष ते स्थळ बघण्यापेक्षा, 'आम्ही असं असं स्थळ बघून आलो' हे लोकांना कळवण्यातच खरा आनंद! या पब्लिसिटीच्या नादात अगदी खाजगी क्षण सुद्धा चव्हाटयावर आणू लागलेत आजकाल लोक.. बरं, तुम्ही आज काय खाल्लं, कितीला उठलात किंवा कुठली सिरीयल पाहिलीत याच्याशी तमाम जनतेचा काय संबंध? (एखाद्या वेळी काही special असेल तर ठीके, पण रोज रोज?!!) खोटं वाटेल पण फेसबुकच्या एका ग्रुपवर नुकतीच एका महाभागांनी एक पोस्ट टाकली होती - 'आज सकाळी माझा गाल चावला गेला!!!!!!!!' अरे? काय हे? आता फक्त 'लघु किंवा दीर्घ शंकेला जाऊन येत असल्याचे' updates टाकू नयेत कुणी म्हणजे मिळवली!!! हा social mediaचा वापर म्हणायचा की गैरवापर?

खरं पहायला गेलं तर 'social' या शब्दात 'समाजाचा' काहीतरी विचार असणं अभिप्रेत आहे. पण मग, 'socially active' असणारे कितीजण खरंच 'समाजासाठी active' असतात? अगदी 'समाजकार्य' वगैरे राहूचदे पण कित्येक घरांमधे आज अशी परिस्थिती आहे की virtual जगातली नाती जोडण्याच्या नादात घरातल्याच म्हाताऱ्या माणसांशी निवांत बसून चार शब्द बोलायला पण कुणाला फारसा वेळ नाही. समाजकार्य करायचं म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात जाणे वगैरे तर लांबचीच गोष्ट झाली.. हां पण social sites वर सामाजिक विषयांवर गप्पा सुरु करा - सगळे पुढे! नुसत्या कृतीशून्य चर्चा.. 'Social' च्या नावाखाली जास्तीत जास्त 'स्वकेंद्रित' होणं म्हणजे 'socially active' असणं असं गणित झालंय बहुतेक. कुठल्याही गोष्टीप्रमाणे यालाही अपवाद आहेत अर्थात. या 'social media' चा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेऊन काही विधायक करणारे लोक ही आहेत; पण दुर्दैवाने खूपच  कमी. बाकीचे सगळे मात्र 'social' पोस्ट टाकता येण्यासाठीच 'life' जगतात की काय देव जाणे!!       
   

3 comments:

  1. कटु वास्तव फार सुंदर शब्दात मांडलंय !

    ReplyDelete
  2. very true! pls share it on wa & fb ��

    ReplyDelete