Thursday, June 8, 2017

वटपौर्णिमा

आज वटपौर्णिमा! सकाळी, सालाबाद प्रमाणे, 'आम्हीच आपले तुमच्यासाठी उपवास वगैरे करायचे, तुम्ही करा की काहीतरी' वगैरे 'हलकेफुलके' विषय झाले.. हे विषय झाले नाहीत तर सावित्री प्रसन्न होत नाही म्हणे!! पण या वर्षी आमच्या 'वडोबाने' अगदी मनावरच घेतलं वाटतं आणि अगदी मोठ्या मनाने जाहीर केलं की रात्रीच्या बापलेकांच्या जेवणाची व्यवस्था मी करण्याची गरज नाही! जे काही खायचं असेल ते घरी बनवूनच हे ही वर कबूल केलं. म्हटलं, चला, हे ही नसे थोडके!!

आता यांची व्यवस्था मी करायची नाहीये म्हणल्यावर मी आपलं खाऊन घ्यावं म्हणलं काहीतरी ४ घास! आज वटपौर्णिमेचा उपवास म्हणून कालच 'अहोंनी' काय काय तरी पदार्थ आणून ठेवले होते.. खाऊन पिऊन अगदी 'कडक' उपवास असतो ना माझा! 😜

तर, मी आपलं कसंतरी उदरभरण करतीये आणि आत्ता, बापलेक दोघंही माझ्या समोर बसून 'homemade' पिझ्झा खात आहेत!! 😈😈 कधी नव्हे ते आमच्या वडोबाला पिझ्झा करावासा वाटला - मला काही करायला लागू नये म्हणून!! 😷😷 बरं, केला ते केला, वर दोघांनी माझ्या समोर बसून ताव मारावा? जाहीर निषेध!!

लेकाला म्हटलं, 'काय रे आईला सोडून सोडून खातोयेस ना?' तर म्हणे, 'तू खा की'.. म्हटलं, 'अरे, माझा उपवास आहे ना..' तर अतिशय निरागस आवाजात पुढचा प्रश्न आला - 'आई, अजून तुझा चंद्रोदय नाही झाला?' आता याला काय सांगू की आजच्या उपवासाला चंद्रोदय कुठला, अमावास्या च असणार आहे!! 😜😜😜

Sunday, May 14, 2017

Mother's Day!!

आज Mother's Day!! काही जण त्याला 'मातृदिन' पण म्हणतात; 'पण मुळात हा आपल्याकडचा दिवसच नाही त्यामुळे त्याला Mother's Day च म्हटलं पाहिजे' असंही काही जण म्हणतात. आपल्याला काय? दोन्हीही पटतं!! 😛

हे असे days वगैरे आले ना की हा असाच प्रॉब्लेम होतो बघा माझा! असे दिवस साजरे करण्याच्या बाजूने आणि विरोधात, दोन्ही प्रकारे हिरिरीने बोलणारे लोक असतात आणि अस्मादिकांना यांचं ऐकलं की यांचं बरोबर वाटतं आणि त्यांचं ऐकलं की त्यांचं... 'आईवरचं प्रेम व्यक्त करायला असा एखादा दिवस कशाला पाहिजे? आम्ही आमच्या आई-वडिलांवर रोजच प्रेम करतो, त्यांचा आदर करतो, असं एखाद दिवस वरवरचं काहीतरी करायचं आणि इतर वेळेला आई-वडिलांच्या मनाचा फारसा विचार पण नाही याचा काय उपयोग?' असं "विरोधक" म्हणाले की मला अगदी मनापासून पटतं.. पण तेवढ्यात "भक्त" कॅटेगरी मधलं कुणीतरी म्हणतं, 'जरी प्रेम रोजचंच असलं तरी प्रतिक म्हणून एखादा दिवस साजरा करायला काय हरकत आहे? तसं तर आपण रोजच वाढतो पण एक दिवशी वाढदिवस करतोच ना? त्या निमित्ताने आयुष्यात चार उत्साहाचे क्षण आले तर काय बिघडलं?' आता हे पण काय चूक आहे का सांगा बघू.. 😛

आपले पु. ल. होते ना, त्यांचा पण असाच प्रॉब्लेम होता म्हणे! म्हणजे, एखाद्या नेत्याची सभा ऐकली की त्याने अगदी भारावून जायला होतंय तोवरच त्याच्या अगदी विरोधी नेत्याची सभा ऐकली तर त्याचं पण बरोबर वाटायचं.. आपल्या व. पु. काळेंनी पण म्हटलं होतं की 'आपण सारे अर्जुन' - म्हणजे बरेचदा confused! आता आहे मोठमोठया लेखकांच्या अन माझ्या विचारात साम्य तर काय, आहे!! 😜

अरे, विषय भरकटला की काय? असो, पु. ल. आणि व.पु. राहूदेत जरा बाजूला तूर्तास.. तर Mother's Day करावा की नाही यावरचं माझं नक्की मत काही अजून ठरलेलं नाही (😛); पण मी काय म्हणते, त्याचं फार स्तोम न माजवता जरा त्या निमित्ताने आईबद्दल चार चांगले शब्द बोलले तर तेवढ्याने काय विरोधक चिडायचे नाहीत माझ्यावर.. तसंही आज पूर्ण दिवसात मी आईसाठी काsही special वगैरे केलं नाहीये आणि मी ज्याची आई आहे त्याच्या तर हे काही खिजगणतीत ही नाही! पण मग आईवरच्या प्रेमाचा उल्लेख, स्मरण करायला काय हरकत आहे?

तर... आजच्या या दिवसाच्या निमित्ताने, जिने मला जन्म दिला, माझं उत्तम पालन-पोषण केलं, जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त चांगले संस्कार माझ्यावर करायचा प्रयत्न केला, माझ्या अक्षरशः असंख्य चुका पोटात घालून परत वर माझ्यावर खूप खूप आणि खूप प्रेमच केलं, जिच्या बाबतीत 'उपकार' हा शब्द खूप रुक्ष / rude वाटतो पण खरंच जिचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, माझं अस्तित्वच मुळात जिच्यामुळे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिच्याशी मी काहीही 'share' करू शकते त्या माझ्या 'लाडक्या मातामाऊलीला' माझा प्रणाम आणि खूप खूप प्रेम!!

जिथे मी जन्म घेतला, आई बरोबरच जिचा 'जननी जन्मभूमिश्र्च' असा महिमा वर्णन केला जातो, जिचे माझ्यावर कळत नकळत अनेक उपकार आहेत ज्यांची मी खरं तर काहीच परतफेड करत नाही अशा माझ्या 'मातृभूला - भारतमातेला' प्रणाम!!

या संपूर्ण जगाला कायमच 'अनंत हस्ते' नुसतं देत रहाणाऱ्या, बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता, अविरत स्वतःचं दानसत्र चालूच ठेवणाऱ्या, जीच्याशिवाय आपलं पान हलूच शकत नाही अशा 'सृष्टीमातेला' माझा विनम्र प्रणाम!!

या संपूर्ण विश्वाची सूत्रं हलवणाऱ्या, सर्वांवर कृपेचा वर्षाव करणाऱ्या, जीच्याकडे जाणे हे आपलं अंतिम ध्येय आहे अशा 'जगतजननी' 'जगन्मातेला' माझा साष्टांग प्रणाम!!

आणि या सगळ्याचं भान देणाऱ्या, जगन्मातेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणाऱ्या आणि त्या ध्येयप्राप्तीत मदत करणाऱ्या, माझ्या असंख्य चुका होत असूनही मला परत परत संधी देणाऱ्या, माझी खरंच काहीही लायकी नसूनही परत परत मला जवळ घेणाऱ्या, माझ्या पाठीशी उभं रहाणाऱ्या माझ्या प्रेमळ, दयासिंधु 'गुरुमाऊली'च्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम!!!

Saturday, May 13, 2017

माणुसकी गमावलेला माणूस...

कालच्या पेपर मधे एक बातमी वाचली. 'नाशिक जवळ कुठेसा एक अपघात झाला तेव्हा रस्त्यावर जमलेल्या लोकांनी जखमींना मदत करण्याऐवजी अपघातग्रस्त गाडीतले काही लाखांचे आंबे पळवले. जखमी विव्हळत पडले असताना, त्यांना उपचारासाठी न्यायच्या ऐवजी, आपल्या घरी जास्तीत जास्त आंबे कसे नेता येतील यासाठी सर्व जमलेल्यांमधे चढाओढ लागली होती.' वाचून काही क्षण तर मन सुन्न झालं, बधिर झालं. कुठे चाललोय आपण? माणूस म्हणजे 'माणुसकी' नसणारा प्राणी अशी व्याखा हल्ली बनत चाललीये की काय? काल ती बातमी वाचल्यापासून चीड, खंत, हतबलता, अस्वस्थता अशा विविध भावनांनी मनात ठाण मांडलंय.

खरंच, माणूस इतका स्वार्थी झालाय का? समोर एखादा माणूस जखमी होऊन, वेदनेने तळमळत पडलेला असताना त्याचं काहीही वाटू नये इतक्या प्रमाणात संवेदना मेल्यात का माणसाच्या? आंबे चोरले ही तर वाईटच गोष्ट आहे आणि त्याचं समर्थन होऊच शकत नाही; पण मी म्हणते, चोरायचेच होते तर आधी किमान त्या जखमींना मदत तरी करायची.. पण असं कसं करणार? त्यांना मदत करून येईस्तोवर इकडे आंबे संपले तर? त्यापेक्षा, ते गोळा करेपर्यंत एखाद्या जखमीचा जीव गेला तर त्यात काय एवढं?

स्वतःला हलकीशी सुई जरी टोचली तरी कळवळणाऱ्या माणसाला दुसऱ्या माणसाच्या वेदनांची जराही जाणीव असू नये? मग माणसात अन पशुमधे काय फरक? अर्थात हे म्हणणं ही काही बरोबर नाही कारण निसर्गाकडे नीट लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येईल की प्राणी पक्षी सुद्धा आपल्यातल्या इतरांना काही झालं तर अगदी अस्वस्थ होतात आणि जमेल तशी अन तेवढी मदत करायचा प्रामाणिक प्रयत्न तरी करतात.. अर्थात, आपण फक्त असे काही videos मिळाले तर ते फॉरवर्ड करणार!!

'दुसऱ्या माणसातही माझ्याप्रमाणेच परमेश्वराचा अंश आहे त्यामुळे त्याच्या वेदनेच्या जाणिवेने माझं मनही दुखावलं पाहिजे' वगैरे उदात्त विचार राहूदेत एक वेळ पण किमान 'उद्या माझ्यावरही ही वेळ आली आणि कुणीच मला मदत करायला आलं नाही तर?' एवढ्या स्वार्थी विचाराने तरी माणसाने दुसऱ्याच्या गरजेच्या वेळेस पुढे व्हायला काय हरकत आहे? अशा वेळी मात्र स्वार्थ बाजूला!

माणूस म्हणजे काय याच्या अनेक व्याखा आहेत त्यापैकी एक अशी ही आहे की 'ज्याला आपल्यासारख्याच इतरांच्या संवेदना जाणवतात तो माणूस!' या व्याख्येनुसार पाहिलं तर आजकाल 'पृथ्वीवर माणूस विरळाच' असंच म्हणावं लागेल बहुदा!! खूप पूर्वीपासून आपल्याकडच्या संत महात्म्यांनी सांगितलंय की 'दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यासाठी, त्याचे दोष पाहण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात कधीच नाक खुपसू नये पण दुसऱ्याच्या गरजेला मात्र कायम पुढे असावं.' संतांनी स्वतः तसं आचरून पण दाखवलंय. पण आज आपलं बरोबर उलटं झालंय - इतरांचे दोष बघायला अगदी पुढे आणि मदतीला मात्र मागे! प्रचंड आत्मकेंद्रीत झालोय बहुदा सगळे..

याचा अर्थ या जगात माणुसकी उरलीच नाहीये किंवा प्रत्येक जण टोकाचा स्वार्थी झालाय असंच पण नाही म्हणता येणार. कित्येकदा, अपेक्षा ही नसताना, आपल्याला माणुसकीचं दर्शन घडवणारे काही अतिशय चांगले अनुभव येतात! चांगले लोक आहेत म्हणून तर जग टिकून आहे. फक्त त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. इतरांचं काय असेल ते असो, पण मी स्वतः तरी त्या कमी लोकांपैकी एक असेन हे बघणं हे माझं कर्तव्य आहे... 

Friday, May 12, 2017

काव्यमय समस्यापूर्ती - ४

समस्यापूर्तीसाठीची ओळ -
"तो प्रवास सुंदर होता"...

त्यावरची माझी कविता -

बालपणीचे दिवस सुखाचे,
परी वेध तेव्हा मोठेपणाचे..
सरता पण ते रम्य बालपण,
वाटे, बरे होतो लहानच आपण..
असता शाळेत, कॉलेज ची धुंद ओढ,
कॉलेजात म्हणे शाळेचेच दिस गोड!
नोकरी करता वाटे माझा बिझनेस हवा,
बिझनेस मधे वाटे, नोकरीच होती बरी बुवा!
तारुण्यात वाटे कधी एकदा 'दोनाचे चार' होतो,
नंतर वाटे प्रत्येकालाच 'एकटा मी काय वाईट होतो?'
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खुणावतो भूत वा भविष्यकाळ,
हातचे सोडून पळताना पण नकळत निसटतो वर्तमानकाळ..
आनंदी जीवनासाठी हे समजून घेणे गरजेचे,
आयुष्य असते कायमच मिश्रण पूर्ण अपूर्णाचे..
समंजस असे हे जीवनभान जागता,
स्वीकारी मन वळणातील अपूर्णता,
मग अपूर्णच जरी, तरी खरे पाहता,
वाटे प्रत्येकच तो प्रवास सुंदर होता!!

Sunday, May 7, 2017

वळीव

प्रचंड उकाडा.. जीवाची नुसती तगमग होतीये.. हवा अशी नाहीच .. वातावरण एकदम कुंद झालेलं.. गच्च गच्च तर इतकं की कधी एकदा पाऊस कोसळतोय असं झालंय पण पावसाच्या धारांच्या ऐवजी घामाच्याच धारा वाहतायेत.. त्यातून लाईट पण गेलेले त्यामुळे पंख्याशिवाय 'जीव जायसे सत्वर करा' अशी अवस्था.. त्यातल्या त्यात, जीव रमवण्यासाठी रेडिओ लावलेला.. तेवढ्यात बाहेर वातावरणात अचानक काही बदल होऊ लागतात, गडगडाट ऐकू येतो, वारा सुटतो - खरं तर वावटळच, मधेच लखकन वीज चमकून जाते.. रेडिओवर आशाताई मखमली आवाजात गात असतात - "जशी अचानक या धरणीवर, गर्जत यावी वळवाची सर".. आणि नेमका त्याचवेळी बाहेर, धरणीला आणि धरणीपुत्रांना तृप्त करायला, वळीव बरसू लागतो!! आहाहा!! किती सुंदर योग!! 

भर उन्हाळ्यात मधेच पडून जाणारा वळीव खरंच खूपच हवाहवासा असतो.. मुंबईकरांच्या भाग्यात हे सुख नाही. पण उन्हाळी सुट्ट्यांसाठी माहेरी असल्यामुळे मला हे सुख अनुभवता येतं! प्रचंड उष्म्याशी लढत असताना मधेच आलेला हा 'देवदूत' गात्र अन गात्र सुखावून टाकतो आणि पुढे किमान महिनाभर तरी चालणाऱ्या उन्हाळ्याशी दोन हात करायला मनाला एक ताकद देऊन जातो! पावसाळ्यासारखा तो सलग चालू राहात नसला तरी भर उन्हाळ्यात मिळालेली त्याची 'short n sweet' झलक उन्हाळा एंजॉय करायला हातभार लावते..
बरेचदा तर हा वळीव येताना बरोबर गाराही घेऊन येतो.. कधी ताडताड लागणाऱ्या तर कधी सुईसारख्या बोचणाऱ्या या गारा वेचणे ही पण एक पर्वणीच!! आणि अशा वातावरणात ice-cream खायची मजा काही औरच!! 

अर्थात, या वळवाच्या पावसाचा कधी कधी अगदी 'फुसका बार' पण निघतो हां.. म्हणजे, आधी हवा अतिशय गच्च होते, मग वारा पण सुटतो पण नंतर नुसतीच वावटळ उडवून वळीव कुठेतरी गायबच होतो किंवा अगदीच किरकोळ असे चार शिंतोडे पडतात आणि मग उलट जास्तीच उकडायला लागतं.. आणि जरा वारा सुटला की लाईट्स मात्र हमखास जाणार!! मग बसा भट्टीत उकडून घेत.. आणि असल्या अर्धवट सरींनी कसलेसे किडे बिडे येतात ते वेगळंच! पण मग तुमच्या सहनशक्तीची पूर्ण कसोटी पाहिल्यावर मात्र तो तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतोच!! 

आपल्या आयुष्यात पण असे 'वळीव अनुभवण्याचे' कितीतरी क्षण येतात, नाही? कधीतरी मन खूप त्रासून जातं, जीवाची घालमेल होते आणि मग, अचानक, मन सुखावून जाणारी एखादी छोटीशीच घटना घडते जी त्यावेळच्या त्रस्त मनावर फुंकर तर घालतेच शिवाय परत नव्याने आयुष्याला सामोरं जाण्यासाठी मनाला उभारीही देते! असे छोटे छोटे वळीव मिळून आपलं आयुष्य किती सुखाचं बनवतात! अर्थात कधी कधी, काही फुसके बार ही निघतात पण ते ही आपली कसोटी बघून आपल्याला 'टफ' करण्यासाठीच असावेत.. आपण थोड्या सहनशक्तीनिशी त्या कसोटीत पास झालो तर परमेश्वरी कृपेचा वर्षाव झाल्याशिवाय खचितच राहणार नाही! 




Tuesday, May 2, 2017

काव्यमय समस्यापूर्ती - ३

समस्यापूर्तीसाठीची ओळ -
"तसा न राहिला आता उदास एकटेपणा"...

त्यावर मी लिहिलेली कविता -

आठवणी ठेवून मागे, सहचर गेला दूर प्रवासा
गर्दीतही एकटेपणाने जीव झाला वेडापिसा

"साथ सुटते कधी अचानक, भकास वाटते रिते जीवन
कुरवाळून ठेवली व्यथा जर, ग्रासून टाकी एकटेपण..
आयुष्याचे वास्तव हे खरे, 'मी' येतो एकटा जातो एकटा
गुंतून पडता सहप्रवाशांत, वेदनेचा रुततो काटा"...

जाणिव होता या सत्याची, शांत झाले क्लांत हे मन
दिसू लागले नजरेला या गरजू अन किती एकटे जन
आठवणींनीच दिली हिंमत, झटकण्या दुबळेपणा
दूर करण्या इतरांची एकाकी, कामी आला एकटेपणा
मन होते हळवे अजूनही, पण त्यात आता न उरला रडेपणा
अजूनही गर्दीत जीव एकटाच, पण तसा न राहिला आता 'उदास' एकटेपणा...

काव्यमय समस्यापूर्ती - २

समस्यापूर्तीसाठीची ओळ -
"बेफाम पसरिते पंख ह्रदय पाखरू"...

त्यावर मला सुचलेल्या ओळी -

ओढ अनामिक 'त्या' माउलीची
गुरुमाय प्रेमळ, मी अजाण लेकरु
पुण्य नसूनही, घेईल मज कवेत
बेफाम पसरिते पंख ह्रदय पाखरु...

मिटूनी जावे द्वैत नकळत
एकची व्हावे शिष्य अन गुरु
तरीही रहावे 'दास' सदोदित
बेफाम पसरिते पंख ह्रदय पाखरु...

ब्रह्मानंद हाचि खरा!!
वर्णन काय नि कसे करू?
उतरेल कधी ही आस सत्यात?
बेफाम पसरिते पंख ह्रदय पाखरु...

काव्यमय समस्यापूर्ती - १

सध्या, फेसबुक वरच्या आमच्या एका समुहावर 'काव्यमय समस्यापूर्ती' असा एक उपक्रम सुरु आहे. पूर्वी, राजे-महाराजे आपल्या पदरी असलेल्या कवींच्या बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी हा प्रकार करत असत. कवींना एखादी ओळ देऊन, त्यावरून साधारण चार ओळींची तरी काहीतरी रचना करायला सांगितली जात असे. त्याच धर्तीवरचा आमचा हा प्रयोग! त्या उपक्रमा अंतर्गत मी केलेल्या कविता (खरं तर कवितांचा प्रयत्न) इथे पोस्ट करत आहे.

समस्यापूर्तीसाठीची पहिली ओळ होती -
"मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?"

त्यावरुन मला सुचलेल्या ओळी -

दिवस संपता संधिकाल, येते तद्नंतर निशा..
टिकत नाही ती ही कायम, पुन्हा दिवस, नव्या आशा..
अविरत चक्र चालूच राही, 'सातत्य' नियम निसर्गाचा...
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?

थांबवू शकला का कुणी खेळ उदय-अस्ताचा?
थांबवू शकला का कुणी प्रवास त्या 'मित्राचा'?
हारू नको, चल ऊठ, वाहुदे प्रवाह जीवनगंगेचा,
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?

Tuesday, March 21, 2017

सलाम!!

ऊन्हाळा सुरु झालाय.. भर दुपारी १२ वाजता, लेकाला अगदी शेजारीच असलेल्या शाळेतून घेऊन येताना सुद्धा, उन्हाच्या झळांनी जीव हैराण होतो. त्यात पण अख्खा 'एक' मजला उतरायचा आणि चढायचा म्हणजे काय खाऊ आहे?! आज पण जरा जीवावर आल्यासारखंच घराबाहेर पडले. खाली बिल्डिंगच्या गेटपाशीच दाते काका भेटले - रोजच्यासारखंच लेकीला शाळेत सोडून, येताना भाजी वगैरे घेऊन आलेले. रोजच्यासारखंच हसून, 'काय, कसं काय? ईशानला आणायला चाललीस का?' म्हणत ते बिल्डिंगमधे शिरले आणि मी शाळेची वाट धरली. आमचा हा जवळ जवळ नित्यपाठच! पण आज तक्रारीच्या मूडमधे बाहेर पडलेल्या मला कुणीतरी थोबाडीत मारून जागं केल्यासारखं झालं!

दाते काका! वय सत्तरीच्या पुढचं. आणि रोज ज्या लेकीला शाळेत सोडून येतात तिचं वय चाळिशीच्या पुढचं!! हो, काकांची लेक मतिमंद आहे. म्हणजे अगदी टोकाची मतिमंद नाही तरी 'गतिमंद'च्या थोडी पुढचीच केस. चाळिशीच्या पुढची ही 'मुलगी' युनिफॉर्म घालून, पाठीवर दप्तर घेऊन शाळेला जाताना दिसली की आत कुठेतरी कससंच होतं; पण त्याहून जास्ती माझा जीव कळवळतो तो काकांना बघून. लिफ्ट नसलेल्या आमच्या बिल्डिंगमधे 'चौथ्या' मजल्यावर हे दाते कुटुंब रहातं. काका, काकू आणि ही त्यांची एकुलती एक लेक. काकूंची तब्येत तशी कायमच नरमच असते - मला तरी वाटतं त्यात वयापेक्षाही 'मानसिक फॅक्टर' जास्ती असावा. त्या फारशा कधी घराबाहेर पडतच नाहीत. त्यामुळे घरातला एकमेव 'खंदा सदस्य' म्हणजे सत्तरीच्या पुढचे काका! लेकीला सोडणे-आणणे, बँकांची कामं, बिलं भरणे, भाजीपाला आणणे, औषधपाणी - सगळ्यासाठी  काकाच खाली उतरतात - हो, अख्खे चार मजले आणि ते पण ऊन्हाळा असो वा पावसाळा.. आणि परत, जाता येता, दिसेल त्याच्याशी हसून चार शब्द बोलल्याशिवाय कधी पुढे जाणार नाहीत!! कसं काय जमत असेल त्यांना हे सगळं?

काका-काकू दोघांनीही वाट्याला आलेली परिस्थिती स्वीकारली असली (स्वीकारण्याशिवाय काही पर्याय ही नाही म्हणा) तरी काकूंचं दुःख बरेचदा त्यांच्या बोलण्यातून बाहेर दिसत राहतं. काका मात्र कधी स्वतःचं दुःख उघड होऊ देत नाहीत. मला आठवतंय, मी लग्न होऊन या बिल्डिंगमधे राहायला आले आणि हळूहळू एक-एक ओळखी करून घ्यायला सुरुवात झाली. Usually, पहिले लहान मुलांशी ओळखी होतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांशी. त्यातून, आम्हाला दोघांनाही लहान मुलांची खूप आवड असल्याने लवकरच बिल्डिंग मधल्या सगळ्या बालचमूला आमचं घर म्हणजे एक हक्काचा अड्डाच झालेला. या सगळ्यांबरोबरच यायला लागली दाते काकांची लेक आरती पण. ती त्यांच्यातच खेळते, वावरते. पहिल्यांदा ती आली तेव्हा मला तिच्याबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे थोडासा अवघडलेपणा आला होता; पण लवकरच इतर सगळ्यांप्रमाणे तीही आमच्यात मिसळून गेली. पण ती आमच्याकडे यायला लागल्याच्या दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी काकूंनी मला फोन केला होता आणि म्हणाल्या, 'आमची आरती तुझ्याकडे येते ना गं? चालेल ना तुला? तिला समज जरा कमी आहे हो. सांभाळून घे बाई.' सर्र्कन काटा आला होता माझ्या अंगावर! आपलं लेकरू चारचौघांसारखं नाही, त्याला काही कळत नाही हे सांगताना कुठल्याही आईबापाला किती यातना होत असतील! तेव्हा मी अजून आई झाले नव्हते तरीही एका आईचं दुःख मला खूप आतपर्यंत हलवून गेलं. काका मात्र दिसले की हसून बोलायचे, 'आरती तुमच्याकडून आली की सारख्या तुमच्याचबद्दलच्या गप्पा मारत असते हो!' असं कौतुकाने सांगायचे. काकूंचं सरळ सरळ दुःख व्यक्त करणं आणि काकांचं हसून दुःख लपवणं, दोन्हीही खूप परिणाम करून जायचं.. 

पुढे, ईशान झाल्यावर तर काकू-काकांची व्यथा मला खूप जवळून जाणवायला लागली. चार माणसात आपल्या लेकाचं कौतुक झाल्यावर त्याच्या स्वतःपेक्षा आईबापाचाच सुप्त अहं कुठेतरी सुखावत असतो! आपल्या बाळाने चारचौघात उठून दिसावं, आपल्या बाललीलांनी जमलेल्यांना हसवावं आणि सगळ्यांकडून शाबासकी मिळवावी यात खरंच किती सुख असतं! पण आपलं मूल हे या अशा पद्धतीने चारचौघात वेगळं उठून दिसत असेल तर त्याचा कुणाला आनंद होईल? आणि हे आता आयुष्यभर असंच राहणार आहे हे स्वीकारणं खरंच कित्ती अवघड असेल! शिवाय आरतीच्या बाबतीत बघितलं तर तिला तसं बरंच समजतं, आसपासच्यांच्यात मिसळायचं असतं. त्यामुळे यांची कायम दुहेरी कसरत! तिला ज्यांच्यात मिसळायचंय त्यांना ते मनापासून हवं असेल की नाही, हिचा कुणाला त्रास तर होणार नाही ना अशा शंकांमुळे एकीकडे हिला सगळ्यांच्यात मिसळू देणं म्हणजे पण अवघड आणि दुसरीकडे तिला कुणात मिसळू न देता सारखं घरात अडकवून ठेवणं पण अवघड. आमच्या बिल्डिंगमधल्या लहान मुलांच्या वाढदिवसांच्या पार्टीला सगळ्या लहान मुलांबरोबर आरती पण येते, तिलाही रिटर्न गिफ्ट हवं असतं, डान्स करायचा असतो. अशा वेळी पण काकूंना खूप त्रास होतो. ज्या लेकीचं, स्वतःच्या मुलांचे वाढदिवस करायचं वय आहे तिला असं लहान मूल म्हणून इतर लहानगयांच्या पार्टीला जाताना बघून आतडं पिळवटेल नाहीतर काय होईल? पण परत दुहेरी कसरत! तिला 'जाऊ नको' म्हणायची सोय नाही. काका आपले वाढदिवसाला देण्यासाठी गिफ्ट आणून देण्याचं काम करतात. 

एकदा काकू खूप वेळ बोलत होत्या. 'पोरीची जात आहे गं, काळजी जास्तीच वाटते. एकीकडे कळत तर काही नाही हिला पण तरुण मुलींप्रमाणे नटा-थटायचं तर असतं, makeup करायचा असतो, टीव्ही मधे बघते ना काय काय तरी मग काहीबाही प्रश्र्न विचारत रहाते.. आता काय उत्तरं देणार हिला? चारचौघांसारखी असती तर आपोआप सगळी हौस पुरवली असती... बरं, बाकी काही कळत नसलं तरी हट्टीपणा बरोबर कळतो.. आता ह्यांचं वय काय कमी आहे का गं? पण रोज उभं राहिलंच पाहिजे... दाखवत नाहीत ते पण आतल्या आत किती सोसतील? माझी मेलीची तब्येत पण धड नसते, यांच्यावरच सगळा लोड येतो..  कळतंय सगळं पण काय करू?' काकूंच्या समोर बसणं सुद्धा अवघड होऊन गेलं.. यांच्यासमोर खरंच किती वेगवेगळे प्रश्र्न आहेत! आणि आमच्या पोरानं जरा आमचं ऐकलं नाही की आमचं बिनसतं.. 

दाते काकूंची तब्येत तर वरचेवर बिघडलेलीच असते पण चाळिशी उलटून गेलेल्या आरतीला पण हल्ली काही ना काही होतच असतं. BP च्या गोळ्या पण आहेत म्हणे. 'ज्येष्ठ नागरिकत्व' मिळून १० वर्षं उलटून गेलेल्या काकांना मात्र आजारी पडायला अजिबात स्कोप नाही! मागच्या वर्षी, पोटाच्या काही आजाराने, काकांना २-३ दिवस हॉस्पिटल मधे काढावे लागले होते. मायलेकी दोघी पुरत्या हबकल्या होत्या. आता काकांना आजारी पडायची पण भिती वाटते. पण तरीही काही न दाखवता एकदा हसून मला सांगत होते, 'अशा वेळी कधी कधी माझी लेक एक्दम शहाण्यासारखी वागते बघ. मला म्हणत होती, "बाबा, सगळं नीट होईल हां, तुम्ही काही काळजी करू नका. माझी काळजी तर मुळीच करू नका, मी नीट राहीन", आता हिला वेडी कशी म्हणू?' आणि पटकन तिथून निघूनही गेले.

जरा ऋतू बदलला की फक्त एक मजला उतरून, भिंतीपलीकडच्या शाळेतून ईशानला आणायला जाताना माझी कुरकुर होते आणि काका मात्र, या वयात, ऊन असो की पाऊस, चार मजले चढ-उतार करत, ईस्टहून वेस्टला (!) लेकीला 'special' मुलांच्या शाळेत सोडायला हसत हसत जातात! ज्या वयात, नातवंडाला स्कूल-बस पर्यंत पोहोचवायचा सुद्धा कंटाळा आला तर काही वावगं वाटू नये, त्या वयात आपल्या - कधीच मोठया न होऊ शकणाऱ्या - मुलीला शाळेला सोडायला विनातक्रार जातात!  मूळचा ऊंच बांधा वयामुळे जरा झुकलेला, डोक्यावरची हिरवळ विरळ होऊ लागलेली, तोंडाचं जवळ जवळ बोळकं झालेलं अशी, वाढत्या वयामुळे येणारी, सर्व शारिरीक 'deterioration'ची चिन्हं दिसू लागली असली तरी मनाच्या ताकदीने त्यावर मात करत राहतात! ही एवढी ऊर्जा कुठून मिळत असेल त्यांना? मला वाटतं, काकांचा दिनक्रम ही त्यांची मोठी उपासनाच आहे! आणि एवढी उपासना करणाऱ्याला स्वतः परमेश्र्वरच शक्तीचा पुरवठा करत असेल खास! 

काहीही असो, काका, तुम्हाला सलाम! सलाम!! सलाम!!!    

    

  
  

Sunday, March 12, 2017

बालकविता - लेकाची फर्माईश!!

महिला दिनावरचं लिखाण करत होते तेव्हा ईशानची - माझ्या लेकाची - मधेमधे लुडबुड सुरु होतीच. 'अरे, हे मोठ्ठया माणसांचं आहे', असं टीप्पीकल उत्तर त्याला दिल्यावर लगेच धोसरा सुरु झाला - 'आई, तू माझ्यासाठी का लिहीत नाहीस कधीच काहीच? लहान मुलांचं काहीतरी लिही माझ्यासाठी आधी'. त्याच्यासाठी काहीतरी लिहायचं प्रॉमिस दिल्यावरच माझी सुटका झाली. ते प्रॉमिस पूर्ण करायचा केलेला हा प्रयत्न:

निघाली झुकझुकगाडी प्राण्यांची 
सफर करायला जंगलाची.. 
छोटे छोटे प्राणी सगळे 
झुक झुक करत गोळा झाले..

कोंबडयाने केले कुकूचकू 
म्हणाला, शिट्टी झाली, चला निघू.. 
इंजिन बनले माकडभाऊ 
त्यांच्या मागे मनीमाऊ.. 
तिच्या मागे भू - भू कुत्रा 
त्याच्या मागे ससोबा भित्रा.. 
कासव म्हणाले मी पण येणार 
ससा म्हणे, आम्ही जोरात धावणार..
मोर आला फुलवून पिसारा 
हरणाचा तर वेगळाच तोरा.. 
भरपूर प्राणी, लांबडी गाडी 
जंगलातून पळते वेडीवाकडी.. 
प्राण्यांच्या डोक्यावर एक-एक पक्षी 
बघत चालले सगळे झाडांची नक्षी.. 

इतक्यात समोर आले वाघोबा
म्हणाले असाल तिथेच सगळे थांबा.. 
मी आहे म्हणे तिकीट चेकर 
आपापली तिकीटे दाखवा भरभर.. 
ज्याच्याकडे तिकीट नसेल,
तो आज माझा खाऊ बनेल.. 
प्राण्यांची उडाली घाबरगुंडी 
नको रे बाबा ही झुकझुकगाडी.. 
सगळ्यांनी तिथून धूम ठोकली 
वाघोबाची फजिती झाली...    

===============================================================

या कवितेवरुन, ईशान अगदी लहान असताना केलेलं एक बडबडगीत आठवलं. माझं तर असं अगदी स्पष्ट मत आहे की बाळ लहान असताना प्रत्येक आईमधून एक सुप्त कवयित्री बाहेर पडत असते. बाळाला भरवताना  असेल, झोपवताना असेल नाहीतर रडणं थांबवताना पण प्रत्येक आई ही कधी ना कधी आपल्या बाळासाठी २-४ ओळी का होईना पण रचतेच रचते - अशा ओळी की ज्यांना एक 'personal touch' असतो. मग भले ते फार लयबद्ध नसेल किंवा व्याकरणाच्या नियमात मुळीच बसत नसेल, पण बाळाला तेच जास्ती आवडतं!! अशापैकीच हे एक छोटंसं बडबडगीत.
आम्ही लहान असताना एक कविता होती - 'इंजिनदादा इंजिनदादा काय करता? कोळसा मी खातो, पाणी मी पितो, गावाला जातो नव्या नव्या'.. त्या चालीवरचं हे माझ्या लेकासाठीचं गाणं..

उंदीरमामा उंदीरमामा, काय करता? उंदीरमामा उंदीरमामा, काय करता?
ची ची मी करतो, ची ची मी करतो, ईशानला हसवतो पळता पळता.. 

मनीमाऊ मनीमाऊ, काय करते? मनीमाऊ मनीमाऊ, काय करते?
म्याव मी करते, म्याव म्याव मी करते, ईशानच्या वाटीतून दुदू पिते.. 

शेरूभाऊ शेरूभाऊ, काय करतो? शेरूभाऊ शेरूभाऊ, काय करतो?
भू भू मी करतो, भू भू मी करतो, ईशानच्या मागे मागे फिरत रहातो.. 

कावळेदादा कावळेदादा, काय करता? कावळेदादा कावळेदादा, काय करता?
काव काव मी करतो, काव काव मी करतो, ईशानशी गप्पा मारतो येता जाता.. 

आणि ईशानभाऊ ईशानभाऊ, काय करता? ईशानभाऊ ईशानभाऊ, काय करता?
ही ही मी करतो, हसत राहतो, आईला पण हसवतो येता जाता!!
 

Wednesday, March 8, 2017

महिला दिन - 2...

आज ८ मार्च. जागतिक महिला दिन! आणि मी या जगातील एक सक्षम, स्वतंत्र, सुंदर (अजून काय बरं?... हो, असं मला काल परवापासून आलेल्या msgs नी सांगितलंय!) वगैरे काय कायशी महिला.. तो आज एक पोस्ट तो बनता हैं!! आधीच क्लिअर करते की ही पोस्ट, mainly तरी, साधारण मध्यमवर्गीय, सुशिक्षीत, फेसबुक, WA वरून व्यक्त होणाऱ्या (रिकामटेकड्या गप्पा ठोकणाऱ्या असं म्हणलं नाही हां मी openly) अशांनाच डोळ्यापुढे ठेवून लिहिलेली आहे. बाकी कष्टकरी वर्गातल्या, खऱ्या गरजू किंवा पीडित अशा महिलांकडे या असल्या पोस्ट्स बिस्ट्स वाचायला वेळ ही नाही आणि असली थेरं त्यांना परवडणारीही नाहीत.

तर, काल-परवापासूनच महिला दिनानिमित्त काही ना काही msgs यायला सुरुवात झाली आणि गेले साधारण ३६४ दिवस विस्मरणात गेलेलं माझं महत्व मला परत प्रकर्षाने जाणवायला लागलं.. नवऱ्याला म्हणलं पण मी काल की 'मूठभर मांस वाढल्यासारखं वाटतंय'; तर त्याने लगेच डोळे मोठे करून, 'अजून किती वाढणार?'चे looks दिले मला.. पण अरे हॅट!! मी एक स्वतंत्र महिला आहे आणि मी किती वाढायचं हे मी ठरवणार!! :P हो, किमान उद्याचा एक दिवस तरी मी माझी स्वतंत्र अस्मिता का काय ती जपणारच! एकंदरीत काय तर जरा 'हवेतच' होते मी काल झोपायला जाताना.. पण आज सकाळ झाली मात्र घरातल्या ५ वर्षांच्या 'पुरुषाने' मला परत जमिनीवर आणायचं काम केलं बरोबर!! 'आज किमान संध्याकाळची एक वेळ तरी मला स्वयंपाकघरातून सुट्टी मिळूदेत' असं सूतोवाच करायला मी सुरुवात केल्यावर लगेच साहेबांना 'आज काय आहे? का आहे?' वगैरे प्रश्र पडलेच आणि मग थोडक्यात सांगितल्यावर लगेच पुढचं वाक्य आलं, 'पण मग परवा बाबांनी पाणीपुरी केली होती तेव्हा आणि मागच्या आठवडयात पावभाजी केली होती तेव्हा पण महिला दिन होता का???'!!! आज बहुदा बाबाकडून लेकाला काहीतरी गिफ्ट मिळणार महिला दिनाचं!!! 

बाप-लेकानी मिळून माझ्या आयुष्यातल्या 'एवढया महत्वाच्या' दिवसाच्या प्लँनिंगला सुरुंग लावायचा प्रयत्न केला तरी आज बधायचं नाही असा पक्का निश्र्चयच केला मी शेवटी आज सकाळी! माझ्या अस्तित्वाला काही किंमत आहे की नाही? एक दिवस तरी मला पूर्ण attention मिळायला नको?

मगाशी लेक विचारत होता, 'आई, आज सगळं तुझ्या मनासारखं केलं की उद्यापासून तू सगळं माझं ऐकणार ना?'!! हो रे बाबा, उद्यापासून काय ठेवलंय आमचं? आजचा दिवस तेवढा आमचा - तो तरी आहे कि नाही देव जाणे! हे सगळं (अर्थात मनात) म्हणतीये मी तेवढयात नवरोजींचा फोन आलाच, 'आज घरी यायला ११.३०-१२ तरी वाजतील, तुम्ही जेवून घ्या!!' घ्या... लागली वात सुरुंगाला?  चला, आता गपगुमान स्वतः स्वतः स्वयंपाक करा आणि करा celebrate!!



    

महिला दिन...

८ मार्च. महिला दिन. 'ती'च्या दृष्टीने रोजच्याच सारखा अजून एक दिवस. महिला दिन म्हणून काही वेगळं celebration  वगैरे करायची गरज तशी तिला कधीच वाटली नाही. त्यातून तर आज नवरा पण ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेल्यामुळे काही एक्सट्राची कामं पण तिलाच उरकायची होती. लेक शाळेतून येईपर्यंत जमतील तेवढी कामं हातावेगळी केली की तिला बरं पडायचं, कारण मग एकदा का लेक आली की तिच्यातच गुंतायला व्हायचं. आठवी मध्ये शिकणारी तिची एकुलती एक लाडकी लेक आता हळूहळू तिची मैत्रीण होऊ लागली होती. लेकीच्या आठवणीने तिच्या चेहेऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं.

तिची कामं होई होईस्तोवर ठराविक वेळी लेक आलीच. पण आज मूड जरा वेगळा वाटत होता. मनात काहीतरी विचार चाललेत हे स्पष्ट जाणवत होतं. मायलेकी जेवायला बसल्या आणि अचानक लेकीकडून, अगदी गंभीर आवाजात प्रश्र आला, 'आई, बाबा तुला फारसं महत्व देत नाहीत का गं?' पहिले तर आईला काही कळलंच नाही आणि मग थोडंसं हसूच आलं. पण लेकीचं मन राखण्यासाठी परत गंभीर होत तिने लेकीला बोलतं करायला सुरुवात केली.
लेक म्हणाली, 'आई, आज womens' day आहे ना? मग तू काहीच स्पेशल का केलं नाहीस? आणि याच वर्षी नव्हे तर आधी पण कधीच मी तुला काही celebrate करताना पाहिलं नाही. माझ्या मित्र-मैत्रिणींपैकी प्रत्येकजण काही ना काही स्पेशल plans सांगत होता आज. कुणाच्या बाबांनी आज नाश्ता बनवला तर कुणी आज हॉटेल मध्ये जाणार आहे. कुणाच्या आईला फुलं मिळाली तर कुणाला surprise गिफ्ट. तुझ्या बाबतीत मात्र यातलं काही तर सोडाच पण बाबा सरळ गावाला निघून गेले....' लेकीने आत साठवलेली सगळी वाफ बाहेर टाकली.
'ती'ने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. आपलं बाळ आता मोठं होत चाललंय आणि या भावी 'महिलेला' नातेसंबंधांविषयी चार गोष्टी सांगायची वेळ आता आलीये असं वाटून तिने हळुवारपणे बोलायला सुरुवात केली.

ती:  सगळ्यात आधी मला सांग, की बाबांनी हा दिवस का साजरा करायला हवा होता?
लेक:  हल्लीच्या 'स्त्री-पुरुष' समानतेच्या काळात तुला पण equal importance मिळायला हवा..
ती:  Celebrate करून?
लेक:  अगं पण आजचं महत्व....
ती:  फक्त एक महिला म्हणून? एकीकडे तू स्त्री-पुरुष 'समानते'बद्दल बोलतीयेस आणि मग, दुसरं काहीच कारण नसताना, मी फक्त 'एक स्त्री आहे' म्हणून आज कौतुक करवून घेऊ? हां आता, स्वतःचे थोडे लाड करून घ्यायला काय कुणाला पण आवडेलच की आणि ते मी मला हवं तेव्हा करून घेतेच की! आणि हो, तुझ्या बाबांना पण आवडत असेलच ना गं स्वतःचे लाड करून घ्यायला? पण तुझं सोड, त्यांना स्वतःलाही १९ नोव्हेंबरला साधी आठवणही नसते. मग त्यांना importance नाही देत का मी?

लेकीला थोडं विचारात टाकून तिने विषय पुढे नेला.

ती:  बर, आता मला सांग, 'स्त्री-पुरुष समानता' म्हणजे नक्की काय गं?

लेक आठवीत म्हणजे तशी लहानच होती अजून. त्यातल्या त्यात सुचलं ते बोलली.

लेक:  म्हणजे दोघांच्यात कुणीही कमी आणि कुणी जास्ती असं नको, एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा असं नको, मुळात पुरुषांनी बायकांना 'तुम्ही असं वागलं पाहिजे आणि तसं नको' वगैरे सांगताच कामा नये.

ती:  मला काय वाटतं सांगू? स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा, एकमेकांच्या मतांचा, भावनांचा आदर करणं सगळ्यात महत्वाचं! तसं झालं की आपोआपच दोघं एकमेकांचा विचार करूनच वागतील आणि कुणी कुणावर काही लादणार पण नाही. पुरुष किंवा स्त्री म्हणून एखादयाकडे न पाहता 'माणूस' म्हणून बघणं जास्ती महत्वाचं! एखादया नात्यात मुलाकडे काही स्ट्रॉंग पॉईंट्स असतील तर दुसऱ्या एखादया केस मध्ये मुलीकडे.. संपूर्ण परफेक्ट असं तर कुणीच नसतं. जिथे एक जण कमी पडेल तिथे दुसऱ्याने टेकू द्यायचा असतो. आणि हे फक्त स्त्रियांनाच लागू आहे असं नाही हां, तर प्रत्येक माणसाने प्रत्येकच नात्यात असा विचार करायला हवा असं मला तरी वाटतं. कारण शेवटी आपल्याला काय महत्वाचं आहे? मिळून मिसळून आनंदात जगणे की मी किती भारी याची टिमकी वाजवणं?

तसं पाहायला गेलं तर स्त्री-पुरुष समानता ही कन्सेप्ट सुद्धा कधी कधी खूप वरवरची वाटते मला. कारण काही मूलभूत शारिरीक आणि वैचारिक बदल जे त्या जगनिर्मात्यानेच निर्माण केले आहेत ते तर कुणीच अमान्य करू शकत नाही आणि त्यातून निर्माण होणारी limitations कुणी टाळू ही शकत नाही. इतर बाबतीत अगदी समसमान वगैरे म्हणायचं तर मला तरी वाटतं की कुठल्या दोन व्यक्ती अगदी एकदुसऱ्यासारख्या, समान असू शकतात? - मग अगदी  दोन पुरुष जरी असले किंवा दोन बायका जरी असल्या तरी - आणि का असाव्यात? खुद्द परमेश्वराने जर प्रत्येकाची एक 'युनिक' अशी 'आयडेंटिटी' बनवलीये तर आपण का 'कुणासारखं' तरी व्हायचा प्रयत्न करायचा? एकमेकांशी तुलना करायचीच कशाला? 

मुळात आपल्या संस्कृतीत 'प्रकृती' आणि 'पुरुष' या दोघांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ अशी तुलना नाहीचे; त्यांना एकमेकांसाठी पूरकच मानलं गेलंय. कुणा एकाशिवाय दुसऱ्याला पूर्णत्व असूच शकत नाही. आपल्या भगवान शिवशंकरांचं 'अर्धनारीनटेश्वर' रूप माहितीये ना? ते हेच सांगतं.

लेक:  आई, तू एवढं एकमेकांविषयी आदर वगैरे म्हणतेस पण बाबांनी कुठे तुझ्या शिक्षणाचा आदर केला? नोकरी सोडून घरीच बसायला लावलं  ना तुला?

ती:  (थोडया कडकपणे) कुणी सांगितलं बाळा तुला असं? अगं, तू व्हायच्या आधी मी पण नोकरी करत होते आणि तू झाल्यावर नोकरी सोडायचा निर्णय सर्वस्वी माझा होता. आणि तुझ्या बाबांनी माझ्या इच्छेचा मान राखून मला ती सोडू दिली हा नक्कीच त्यांचा मोठेपणा होता कारण त्यावेळी आपल्या घरातली आर्थिक स्थिती फार काही खास नव्हती. पण माझ्या डोक्यात बालसंगोपनाबद्दलचे माझे असे काही खास विचार होते आणि म्हणून मला नोकरी सोडायचीच होती. पैशांची गरज असूनही त्यांनी माझ्यावर ती नोकरी लादली नाही सोन्या! मला माझ्या मनाप्रमाणे वागू दिल.

लेक:  (नवंतरुण विचारांमुळे थोडीशी उसळून) आई, तू असं काय बोलतीयेस अगदी त्यांनी उपकार केल्यासारखं? तू नोकरी करावीस की  नाही हा पूर्णपणे तुझाच निर्णय असणार ना.. त्यात काय एवढं?

ती:  का? संसार काय माझा एकटीचा होता किंवा आहे - मी एकटीच्या विचाराने निर्णय घ्यायला? उद्या तुझ्या बाबांनी अचानक नोकरी सोडायची ठरवली आणि माझा विचारही घेतला नाही तर? आमचा संसार सुरु होताना आमच्या दोघांच्या पगाराला जमेस धरून सुरु झाला होता. त्यामुळे माझ्या नोकरी सोडण्याचा त्यांच्यावर खूप लोड येणार होता. तरी त्यांनी माझ्या इच्छेचा मान ठेवला हा त्यांचा मोठेपणा नाही? एकमेकांचा काडीचाही विचार न करता 'माझे निर्णय माझे, तुझे तुझे' असंच करायचं असेल तर मग कुटुंब म्हणून एकत्र तरी कशाला राहायचं? आजच्या पिढीचं बऱ्याच प्रमाणात हेच झालंय की ते 'माझं-माझं' म्हणत राहतात, 'आपलं' होऊच देत नाहीत.. आणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य, स्वतःची so called 'space' जपताना, दुसऱ्याला मात्र गृहीत धरतात.

लेक आता थोडी अंतर्मुख झाली होती.

ती:  बाळा, तसं बघितलं तर आयुष्य खूप सोपं आणि सुंदर आहे गं! आपण उगीचच त्याला किचकट करून ठेवतो. आपल्या चांगल्या घडणीच्या दृष्टीने आपण ज्यात लक्ष घालायला पाहिजे, ज्यावर खरंच विचार करायला पाहिजे असे इतर खूप महत्वाचे विषय असतात जगात, पण आपण नको त्यातच वेळ आणि शक्ती वाया घालवतो. सतत कोर्टात उभं असल्यासारखं 'भांडण-mode' मध्ये असतो. खरं तर ना, प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली असते आणि प्रत्येक स्त्री मध्ये एक पुरुष! बघ ना, आपण आपल्या विठ्ठलाला किंवा संत ज्ञानेश्वरांना 'माऊली' म्हणतो आणि आपली देवी भयंकर असुरांचं मर्दन करायचं काम करते!! गरजेच्या वेळी बाहेर काढायसाठी, प्रत्येकाने आपल्या आतल्या त्या दुसऱ्या भागाचं अगदी नकळत जतन केलेलं असतं, करायचं असतं. मुलांनी मुलींना किंवा मुलींनी मुलांना कमी लेखणं म्हणजे स्वतःमधल्याच एका अविभाज्य घटकाला नावं ठेवण्यासारखं नाही का?

विचारात बुडलेल्या आपल्या चिमणीला तिने हलकेच जवळ घेतलं. लेकरू अजून लहान होतं.

ती:  आणि आता अगदी शेवटची म्हणून तुला एक मजा सांगू? हे सगळं असलं तरी ना, तुझ्या बाबांनी आत्तापर्यंत दर womens' day ला मला गुलाबाचं एक सुंदर फूल दिलंय हां, अगदी न चुकता! आणि मी पण ती सगळी अजून जपून ठेवलीयेत!! चल तुला दाखवते...

लेकीच्या गालावर फुललेले गुलाब तिचा 'महिला दिन' खास करून गेले!!!



   

    

Wednesday, February 22, 2017

सोशल लाइफ...

काल कुठेशी एक बातमी वाचनात आली - 'कित्येक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या  मृत्यूच्या बातमीने त्यांच्या ट्वीटर खात्यावर पडला RIP चा पाऊस!' इतर कुठेच ही बातमी नव्हती आणि tv वर पण काही नव्हतं त्यामुळे जरा आश्चर्यानेच मी पुढे वाचायला लागले. तर, त्या बातमीत लिहिलं होतं की कुठल्याशा social site वर काही चुकीने फरीदा जलाल यांच्या प्रोफाईल खाली त्यांच्या जन्म तारखेबरोबरच मृत्यूची तारिख पण दिली होती आणि ती कालचीच होती आणि ते बघून लोकांनी RIP चा अक्षरश: पाऊस पाडला होता. नंतर कळलं की फरीदा जलाल अगदी व्यवस्थित आहेत! म्हणजे अगदी 'आपुले मरण पाहिले म्यां डोळा' अशी अवस्था अनुभवली असेल नाही जलाल बाईंनी?!! मला आठवतंय, अगदी लहानपणी, जेव्हा मरण हि संकल्पना नुकतीच माहिती होऊ लागली होती तेव्हा, मला वाटायचं की आपण मेलं तरी हळूच डोळे उघडून बघता यायला हवं आपल्याला मधेच; म्हणजे आपल्यासाठी कोण किती रडतंय वगैरे बघता येईल आपल्याला! आज ते भाग्य फरीदा जलाल यांना लाभलं बुवा!! आणि हे असं भाग्य लाभलेल्या त्या काही पहिल्याच नाहीत बरं. गेल्या २-३ वर्षांत, शक्ती कपूर, राजपाल यादव यांसारख्या अजूनही काही celebrities च्या बाबतीत असे किस्से घडले आहेत. भाग्यवानच नाही हे सर्व? लोक आपल्यावर किती 'प्रेम' (?) करतात ते यांना 'याची देही याची डोळा' बघता आलं.. 

हे विनोदी नाहीये खरं तर. Social media नावाचं एक वादळ दिवसेंदिवस जास्त जास्तच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करायला लागलंय. या वादळाने उडवलेली धूळ डोळ्यात - आणि डोक्यातही - गेल्यामुळे , आता आपण नक्की कुठे चाललोय किंवा काय करतोय हे बहुतेक कुणाला कळेनासंच झालंय. त्यामुळेच बहुदा, आपण कुठे काय reaction देतोय, आपण जे फॉरवर्ड करतोय ते खरंच खरं आहे की नाही, त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात याचा साधा विचार करायचं भानही अनेकांना राहिलेलं नाही. आला काही मेसेज की कर Whatsappवर १०० जणांना फॉरवर्ड नाहीतर टाक फेसबुकवर.. दुर्दैवाने, या 'डोकं गहाण टाकून नुसतं येईल ते फॉरवर्ड' करण्याच्या नादात माणसांची ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी हरवत चालली आहे. कारण कितीशी माणसं स्वतः काही विचार करून, लिहून वगैरे पोस्ट करतात? 'बस ईधरका माल उधर'!!

सुरवाती सुरवातीला, एकमेकांपासून दूर गेलेल्या माणसांना जवळ आणण्यासाठी कौतुकपात्र ठरलेल्या या social media चा आता खरोखर अतिरेक झालाय. आता ते दूरचेच इतके जवळचे वाटू लागलेत की खरे जवळचे नजरेआड होत चाललेत. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी धडपणे बोलायलाही वेळ नसणाऱ्या माणसांकडे virtual जगतात इतकं ऍक्टिव्ह असायला वेळ कसा असतो हे एक आश्र्चर्यच आहे. अनेक दिवसांनी एकत्र आलेली बहिण-भावंडं, मित्रमंडळी जेव्हा समोरासमोर एकमेकांशी बोलून, मनाने जास्त जवळ येण्याऐवजी एकाच खोलीत बसून, पण आपापल्या मोबाईल्स मधे डोकी खुपसून, त्यावरच्या कुठल्याशा ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी बोलताना (?) दिसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते खरंच! म्हणजे आपण ज्या व्यक्तीशी virtual माध्यमातून बोलत आहोत ती स्वतः, प्रत्यक्ष, आत्ता या क्षणी आपल्या समोरच आहे आणि आपण तिच्याशी फेस -टू-फेस पण बोलू शकतो हेही विसरायला होत असेल माणसाला? आणि मग त्यातूनच 'नवरा, जेवणाच्या टेबलवर समोरच बसलेल्या बायकोकडे पोळी पण Whatsapp वरूनच मागतोय' अशा प्रकारचे jokes (?) तयार  होतात आणि मग काय? ते पण हजारोंना फॉरवर्ड!!

आपल्या आयुष्यात घडणारी अगदी छोट्यात छोटी आणि खरं तर ज्याने दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही अशी प्रत्येक घटना social websites वर टाकून पब्लिसिटी मिळवायचं व्यसनच जडलंय हल्ली कित्येकांना.. मग मतदान केल्याचे photos टाकणं म्हणजे तर फारच 'important' गोष्ट! आपण आपलं एक बेसिक कर्तव्य पार पाडलंय हे कळायला नको का जगाला?! कुठल्याही प्रेक्षणीय ठिकाणी जा, माणसांना ते स्थळ, तो परिसर डोळ्यात साठवून घेण्यापेक्षा स्वतःची छबी कॅमेऱ्यात साठवण्यातच जास्ती इंटरेस्ट असतो. आणि मग लगेच त्या छब्या जातात फेसबुकवर. म्हणजे प्रत्यक्ष ते स्थळ बघण्यापेक्षा, 'आम्ही असं असं स्थळ बघून आलो' हे लोकांना कळवण्यातच खरा आनंद! या पब्लिसिटीच्या नादात अगदी खाजगी क्षण सुद्धा चव्हाटयावर आणू लागलेत आजकाल लोक.. बरं, तुम्ही आज काय खाल्लं, कितीला उठलात किंवा कुठली सिरीयल पाहिलीत याच्याशी तमाम जनतेचा काय संबंध? (एखाद्या वेळी काही special असेल तर ठीके, पण रोज रोज?!!) खोटं वाटेल पण फेसबुकच्या एका ग्रुपवर नुकतीच एका महाभागांनी एक पोस्ट टाकली होती - 'आज सकाळी माझा गाल चावला गेला!!!!!!!!' अरे? काय हे? आता फक्त 'लघु किंवा दीर्घ शंकेला जाऊन येत असल्याचे' updates टाकू नयेत कुणी म्हणजे मिळवली!!! हा social mediaचा वापर म्हणायचा की गैरवापर?

खरं पहायला गेलं तर 'social' या शब्दात 'समाजाचा' काहीतरी विचार असणं अभिप्रेत आहे. पण मग, 'socially active' असणारे कितीजण खरंच 'समाजासाठी active' असतात? अगदी 'समाजकार्य' वगैरे राहूचदे पण कित्येक घरांमधे आज अशी परिस्थिती आहे की virtual जगातली नाती जोडण्याच्या नादात घरातल्याच म्हाताऱ्या माणसांशी निवांत बसून चार शब्द बोलायला पण कुणाला फारसा वेळ नाही. समाजकार्य करायचं म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात जाणे वगैरे तर लांबचीच गोष्ट झाली.. हां पण social sites वर सामाजिक विषयांवर गप्पा सुरु करा - सगळे पुढे! नुसत्या कृतीशून्य चर्चा.. 'Social' च्या नावाखाली जास्तीत जास्त 'स्वकेंद्रित' होणं म्हणजे 'socially active' असणं असं गणित झालंय बहुतेक. कुठल्याही गोष्टीप्रमाणे यालाही अपवाद आहेत अर्थात. या 'social media' चा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेऊन काही विधायक करणारे लोक ही आहेत; पण दुर्दैवाने खूपच  कमी. बाकीचे सगळे मात्र 'social' पोस्ट टाकता येण्यासाठीच 'life' जगतात की काय देव जाणे!!       
   

Friday, February 17, 2017

प्रिय अमृता....

कालच माझ्या ज्या बहिणीच्या मुलाच्या मुंजीबद्दल लिहिलं ती माझी मामेबहिण अमृता.. माझी अतिशय लाडकी बहिण! माझ्याहून जवळ जवळ ३ वर्षांनी लहान. पण लहानपणापासूनच आमच्यात खूप जवळिकीचे आणि मैत्रीचे संबंध. काल तिच्या लेकाच्या मुंजीबद्दल लिहीताना, मनात तिच्याच बद्दलचे विचार असल्यामुळे असेल कदाचित, अचानक तिच्याबद्दलच्या भावना कवितेचं रूप घेऊन आल्या! अमृ, ही कविता तुला सप्रेम सादर...


प्रिय अमृता...

गीत आले कुठून अचानक, साज लेऊनी मम भावांचे,
गूज मनीचे सांगायाला, तू स्थान माझे हक्काचे..
जन्मलो बहिणी म्हणूनी, परी नाते जपले मैत्रीचे...

किती वेगळ्या तरी किती सारख्या,
जिवाभावाच्या आपण सख्या..
वेगळेपण जपून दुसरीचे, नाते जपले सख्याचे...

ना सहवास रोजचा, ना सततच्या भेटीगाठी,
तरी मनाचा एक कोपरा राखलेला तुझ्यासाठी..
दूर अशा अंतरावरूनही, नाते जपले जवळिकीचे...

लागो दृष्ट ना कधी, राहो अभंग हे नाते,
वितुष्ट न येवो काही, देवाकडे हेच मागते..
गोडी राहो अनंत काळ, नाते जपले 'अमृता'चे!!!


मुंज सोहळा...

चार दिवसांपूर्वी आमच्या खूप जवळच्या नात्यात, म्हणजे 'अगदी आमच्याच घरातल्यासारखं' म्हणतो ना आपण तशा जवळच्या नात्यात, मुंज होती - माझ्या बहिणीच्या मुलाची, वेदांगची. खूप दिवसांनी इतक्या जवळच्या नात्यातलं कार्य होतं. त्यामुळे मस्त enjoy करून घेतलं बऱ्याच दिवसांनी! सध्याच्या धकाधकीच्या lifestyle मुळे लवकर जायचं म्हणलं तरी फार काही लवकर जाता आलंच नाही. तरी २ दिवस आधीपासून तळ ठोकलाच आम्ही तिच्याकडे! आणि  मग सुरवात झाली धमाल करायला! मुळात, आम्हा बहिणींना हसायला एवढं तेवढं कारणही पुरतं  नेहमीच; त्यात इतक्या दिवसांनी इतके सगळे एकत्र आल्यावर मग काय विचारता?  

गेल्यावर, बहिणीला मदत करत करत simultaneously च भेंडया, मग हसाहसी, गप्पा, मग हसाहसी असं सगळं सुरूच झालं. त्यात आमचा ५ वर्षांचा हिरो - ईशान - काही ना काही चाळे करून सगळ्यांकडून कौतुक करवून घेत होता! कुठे, कसं impression मारावं आणि भाव खाऊन घ्यावा हे न शिकवताच कसं येतं देव जाणे! मला वाटतं, बाबा कडून घेतली असावी ही कला लेकाने! कारण या २ दिवसांत आमच्या नवरोजींनी पण जे काही impression पाडलंय म्हणता सगळ्यांवर! 'आमचा जावई अगदी गुणाचा आहे हो, कुठल्याही कामाला मागे नाही' हे वाक्य १०० दा तरी ऐकवलं असेल मला वेगवेगळ्या लोकांनी.. शेवटी मला वाटायला लागलं की यातल्या किमान दोघा - चौघांना तरी आपल्या बरोबर घरी घेऊन जावं - कर म्हणावं जावयाला काय ती कामं! 

मुंजीच्या आदल्या दिवशी ग्रहमक होतं. तेव्हापासून कार्याला सुरवात झाली. मुहुर्तमेढ रोवणं, देवक ठेवणं, होम अशा सगळ्या विधींनी वातावरण अगदी प्रसन्न  झालं. मुंडावळ्या बांधलेला वेदांग किती गोड दिसत होता म्हणून सांगू! पूर्ण विधी होईपर्यंत अगदी शांत बसून राहिला होता.   

त्या दिवशी कित्ती कित्ती दिवसांनी बांगडया भरायला आलेल्या कासार मावशींकडून हातात मस्त हिरव्या बांगडया भरून घेतल्या. खूप पूर्वी कधी तरी ऐकलं होतं की हातात चुडा भरून देणाऱ्या कासारणीच्या पाया पडायचं असतं. कसं काय कोण जाणे पण त्या क्षणी अचानक ते आठवलं आणि त्या मावशींना नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्या छोटयाशा कृतीचं महत्व पटलं आणि मला ती बुद्धी दिल्याबद्दल देवाचे आभार मानले! नंतर मेंदी प्रोग्रॅम झाला. अगदी कितीही मॉडर्न मुलगी असूदे पण मेंदीने रंगलेला हात आणि त्यात हिरव्या बांगडया कशा खुलून दिसतात ना? आपलेच हात अधून-मधून सारखे निरखावेसे वाटतात! 

ऐन वेळपर्यंत चाललेली काही ना काही तयारी, कुणीतरी उशीरा येणारे पाहुणे, राहिलेल्यांची मेंदी, त्यात गप्पा, हसाहसी, मधेमधे पोराटोरांचे गोंधळ, मग 'चला झोपा रे लवकर, उद्या लवकर उठायचंय ना?' असा ज्येष्ठांनी दिलेला दम (अगदी आम्हा मोठ्ठयांनाही) अशा अगदी टीप्पीकल 'कार्य'वाल्या वातावरणात एकदाचा दिवस-  खरं तर जवळ जवळ अर्धी रात्र - संपवून पहाटेच्या प्रतिक्षेत जेमतेम २-३ तासांसाठी झोपायला गेलो तेव्हाही मन उत्साहातच होतं!

मग main मुंजीच्या दिवशीची धांदल तर काय विचारता? प्रत्येकाला  लवकरात लवकर आवरून तयार होण्याची घाई.. त्यात आमच्यासारख्या लेकुरवाळ्यांना तर स्वत:चं आवरून शिवाय पिल्लाचं ही आवरायचं असल्यामुळे double दंगा! पोरांना मस्त मस्त ट्रेडिशनल कपडे - स्वतःच्याच हौसेखातर खरं तर - चढवून, त्यात त्यांना uncomfortable वाटत असेल आणि त्यांची तक्रार असेल तरी 'तुला हेच कसं छान दिसतंय'  हे त्यांना पटवून देऊन, त्या घाईत पण मधेच लाडाने त्यांचे फोटो काढण्याचं "महत्वपूर्ण" काम करत करत स्वतःचं आवरायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे?! आवरून झाल्यावर स्वतःचं  रूप usually पसंत पडत नाहीच.. बरं, प्रत्येकजण दुसरीला म्हणणार, 'wow! किती सुंदर दिसतीयेस तू! नाहीतर मी , अवतार नुसता!!' म्हणजे आता मला वाटतंय की त्या दिवशी एक तर सगळ्याच जणी 'किती सुंदर' तरी दिसत असाव्यात किंवा एकजात सगळ्या 'अवतार' तरी!! :P :D        

आवराआवरीच्या सर्व दीव्यांमधून पार पडून मुंजीच्या हॉल वर पोहोचलो. तिथे स्टेजवर 'झाडाखाली बसलेले एक ऋषी आणि त्यांच्यासमोर अध्ययनाला बसलेले ३-४ बटू' असे cutouts बनवून खूप सुंदर देखावा उभा केला होता. एकदम वेद काळात गेल्यासारखं वाटलं! त्या सगळ्या बटूंच्या पुढयात बसलेला आमचा छोटा बटू कसा तेजस्वी वाटत होता! 

एकदा स्टेजवर विधी सुरु झाले की लागेल तेवढी थोडीफार मदत करण्याशिवाय आम्हाला काय काम? मग काय गप्पा, हास्यविनोद आणि आजूबाजूचं निरीक्षण.. अशा कार्याच्या वेळी जमलेल्या, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे नुसतं शांतपणे लांबून बघणं ही  पण एक खास मजा असते. किती वेगवेगळे नमुने बघायला मिळतात! आमच्या वेदांगला चांगल्या ४ पणज्या आहेत. त्या सगळ्याजणी अगदी कृतार्थ चेहेऱ्याने सगळे कार्यक्रम बघत बसल्या होत्या - मधूनच कुणी भेटायला येईल त्याला आशीर्वाद देत आणि आपण जे समजून आशीर्वाद दिला तीच ही व्यक्ती होती ना नक्की याचा नंतर विचार करत!! :D आज्जी कॅटेगरीच्या बायका एकीकडे आपल्या नातवंडांना आणि एकीकडे आपल्या आईला सांभाळत, आपल्या बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या लेकी किंवा बहिणी वगैरेंशी गप्पा मारत कार्यक्रमाचा आनंद लुटत होत्या. त्यानंतर आमच्यासारख्या ज्या लेकुरवाळ्या मावश्या, माम्या, आत्या होत्या त्या थोडीफार मदत करत, 'आता आपले काही तरुणपणाचे दिवस राहिले नाहीत' च्या अविर्भावात, पण तरीही एकीकडे 'अगदीच outdated वाटू नये' असाही प्रयत्न करत, जास्ती करून मुलाबाळांबद्दल गप्पा मारत, मधेच आपापल्या नवऱ्याकडे कटाक्ष टाकत enjoy करत होतो! त्याहून लहान अशा नवतरुण मावश्या, आत्या किंवा ताया यांची मजाच काही और! त्या आपले सगळे साजशृंगार सांभाळत, भिरभिर नजरेने, आपल्याला कोण कोण न्याहाळतंय याचा अंदाज घेत, फुलपाखरासारख्या इकडून तिकडे तरंगत होत्या!! अगदी छोटया आपल्या निरागसपणे पळापळी करत चिवचिवत होत्या. पुरुषांचं सगळ्यांचं साधारण सारखंच, फार काही सांगणे न लगे!

आमचा  आपला खाली टाईमपास चाललेला असताना स्टेजवर वेदांग अन त्याचे बाबा मुंजीचे विधी पार पाडत होते. खरं तर २-३ दिवसांपासून चाललेली सगळी धावपळ, जागरणं, वेगवेगळं खाणं यामुळे वेदांगची तब्येत नेमकी त्या दिवशी जरा बरी नव्हती; पण बिचाऱ्याने कुठेही चिडचिड, रडरड न करता, अगदी समजुतदारपणे पूर्ण सहकार्य केलं. अगदी गुणी बाळ! त्यामुळे माझ्यासारख्या समस्त मातृवर्गाला, नेहमीप्रमाणे, आपापल्या पोरांना द्यायला एक नविन उदाहरण मिळालं - 'बघितलंस ना, एवढा त्रास होऊन पण वेदांग दादा कसा शहाण्यासारखा वागतोय ते?!!' अर्थात पोरांना बरोबर कळतं कुठल्या बाबतीत कुणाचं अनुकरण करायचं ते.. 

तेवढी वेदांगची तब्येत सोडली तर बाकी सगळा कार्यक्रम अगदी दृष्ट लागण्यासारखा झाला! सगळ्यांनी आपापल्या परीने भरपूर enjoy केलं. असे प्रसंग अधून मधून सतत यायला हवेत, एकदम रिफ्रेश व्हायला होतं. म्हणूनच की काय देव जाणे पण आमच्याही नकळत आमचा लेक सगळ्यांना 'पुढच्याच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या' (?) त्याच्या मुंजीचं आमंत्रण देऊन आलाय म्हणे!!!                    

  

Thursday, February 16, 2017

I MISS YOU...

They said, 'you look beautiful today',
How I wished You were there too...

They said, 'you smile soo sweetly',
I smiled again, thinking of You...

'Your eyes look beautiful while smiling', they said,
My eyes kept on looking for You...

'Actually', they said, 'something is different than usual',
The difference, I knew, was because of You...

They kept on saying, they kept on praising,
I wished to hear it all from You...

‘But, you are so silent today,’ said one,
I heard my mind communicating with You...

The fun went on, they enjoyed so much,
I felt so lonely in the crowd without You...

I talked to them and I laughed too,
But deep in my heart, I just missed You...

प्रेम म्हणजे...

Valentine day बद्दल लिहिताना अचानक खूप पूर्वी केलेल्या दोन कविता आठवल्या. त्या इथे पोस्ट करण्याचा मोह  होतोय. पैकी ही कविता तर खूपच जुनी म्हणजे ९७ साली, मी ११वी मधे असताना केलेली आहे. 

प्रेम म्हणजे... 

प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!

सगळे नाना तर्क करतात,
प्रेमाला निरनिराळी नावे देतात.. 
पण खरंच प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!

प्रेम  असते देवाची देणगी,
प्रेमात माणूस बनतो त्यागी.. 
प्रेम सुंदर कोमल भावना!
मनोदैवताची मूक आराधना.. 
प्रेम कसं, बहुरूपी असतं,
कधी असं तर कधी तसं असतं.. 
प्रेम पाण्याप्रमाणे शुद्ध असतं,
प्रेम स्फटिकाप्रमाणे निर्मळ असतं.. 
प्रेम म्हणजे जीवन असतं,
प्रेम म्हणजे सबकुछ असतं!

प्रत्येकजण असा काहीतरी विचार करतो,
आपापलं मत सांगून जातो.. 
पण खरंच प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!

खरंच, प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे फक्त प्रेमच असतं!
प्रेम म्हणजे काय ते जाणून घ्यायचंच नसतं,
प्रेमाचं सुंदर विश्र्व फक्त अनुभवायचं असतं!!!